जळगावात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र ? , मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…

Spread the love

धरणगाव : – जून महिन्यात राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता राज्यात शिवसेनेतच दोन गट पडले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे कोसळले आणि शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीसुद्धा अजूनही आमचा गट हीच खरी शिवसेना आहे, असे सातत्याने शिंदे गटाकडून सांगण्यात आहे. अशातच जळगावात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

काय आहे नेमकं प्रकरण –

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव याठिकाणी श्रीजी जिनिंग आहे. तिथे आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. याच कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते. जळगावमध्ये मंत्री गुलाबाराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात याठिकाणी हे दोन्ही गट एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

धरणगावातली श्रीजी जिनिंग ही शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, जीवन अप्पा बयस यांच्या मालकीची आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. त्यांच्याच जिनिंगमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील येतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गटाचे नेते सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे आणि त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण –

या कार्यक्रमात शिंदे गट आणि ठाकरे गटातील सदस्य, कार्यकर्ते एकत्र उपस्थित होते. त्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणात असं चालत असतं. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे आहेत. मग काय ते एकमेकांच्या सुख-दुःखात नाही जात का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मी व्यक्तिगत संबंध खराब करणारा माणूस नाही आणि आम्ही काय एकमेकांना गोळ्या मारलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरणही मंत्री पाटील यांनी दिले. राजकारणाच्या आखाड्यात जो तो ज्याची त्याची कुस्ती लढेल, असेही ते म्हणाले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार