स्‍टेटसवर स्वतःलाच श्रध्दांजली‌ वाहिली, नंतर घराबाहेर जाऊन तरुणाने संपवले जीवन

Spread the love

हिंगोली : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वतःच भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेऊन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी ता. २७ उडकीस आला आहे. वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. नवल जयराम नायकवाल (२८) असे तरुणाचे नाव असून याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील जयराम नायकवाल यांचे कारेगाव शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली. मात्र अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पेरणीसाठी घेतलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

दरम्यान, नवल नायकवाल याने गावात हमाली काम करून वडिलांचे कर्ज फेडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र कर्ज फिटण्यास मोठा कालावधी लागेल यामुळे नवल अस्वस्थ होता. शनिवारी ता. २६ सायंकाळी तो हमालीचे काम करण्यासाठी जातो असे सांगून घरा बाहेर पडला. यावेळी त्याने स्वतःच्या स्टेटसवर नवल भावपूर्ण श्रध्दांजली असे नमुद केले. तर साई मंदिराच्या मागे असेही स्टेटसवर नमुद केले आहे. मात्र या प्रकाराचा उलगडा त्यांच्या कुटुंबियांना झाला नाही.

दरम्यान, आज सकाळी नवल याचा मृतदेह साई मंदिराच्या मागे असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, जमादार अनिल भारती, चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी जयराम नायकवाल यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार