माहिजीदेवीचा आजपासून यात्रोत्सवास सुरवात ; गिरणा तीरावर भरणार यात्रोत्सव!

Spread the love

नांद्रा (जि. जळगाव) : सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यात्रानां सुरवात झाली आहे अश्यातच माहिजी (ता. पाचोरा) येथील माहिजीदेवीचा यात्रोत्सव शुक्रवारपासून (ता. ६) सुरू होत आहे. गिरणा नदीच्या तिरावर नांद्रापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या माहिजीदेवीचा यात्रोत्सव हा संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेल्या या यात्रोत्सवाचा जल्लोष पंधरा दिवस सुरू असतो.

ब्रिटिश काळात येथे करवसुली व्हायची. तेव्हा या भागात कुठेही बाजारपेठ उपलब्ध नव्हती, त्यामुळे ही यात्रा सहा महिने भरायची. देवीच्या आख्यायिकेनुसार, सोळाव्या शतकात येथे मंदिर उभारणी झाली. तेव्हा येथे सहा महिन्यांची यात्रा भरू लागली. संपूर्ण देशभरातून व्यापारी येथे येत होते. या यात्रोत्सवात लोकनाट्य, पाळणे, मौत का कुआ, भांड्याचे दुकाने, हॉटेल, खेळणी, प्रसादाची दुकाने, रसवंती अशा नानाविध प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने अशी विविधता असलेल्या यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पाचोरा व एरंडोल आगारातून जादा बसची व्यवसाय केली जाते. ग्रामपंचायतीकडून सर्व व्यवस्था केली जाते.

नवसाची परंपरा व पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. चावदसला पहाटे संपूर्ण अंगावर निंबाच्या झाडाचे पत्ते लावून नवस फेडला जातो. पौर्णिमेला शुक्रवारी (ता. ६) सकाळी पाचपासून ते दहापर्यंत देवीचा पालखी सोहळा व पादुका पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. वरसाडे प्र. बो. येथे देवीच्या पादुका राहिल्या होत्या. तेथेही पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या माहिजी देवी मंदिर संस्थानचा तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत भव्य मंदिर निर्माण, रस्ते, शौचालय, पाण्याची टाकी, संरक्षकभिंत अशी विविध कामे होत आहेत. त्याचबरोबर येथूनच एरंडोल तालुक्याला जोडणारा ‘गिरणा’वरील पुलासाठी आमदार किशोर पाटील यांनी २१ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामांमुळे माहिजी देवी यात्रोत्सवाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार