कचरा वेचत होती, अचानक विजेच्या तारेचा स्पर्श अन् क्षणात होत्याचं नव्हतं… मग

Spread the love

चोपडा :- चोपडा शहरातील वीज तारांमुळे विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणी सोमवारी मृत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिता महेंद्र अहिरे (वय ३५ वर्षे रा. शेतपुरा चांभारवाडा, चोपडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

चोपडा शिवारातील हॉटेल जयेशच्या मागे महाराष्ट्र विद्युत वीज कंपनीच्या ११ के. व्ही विद्युत तारांचे जमिनी पासूनचे अंतर नियमापेक्षा कमी होते. महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा यांनी विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदर ठिकाणी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अनिता महेंद्र अहिरे या कचरा वेचत असताना जमिनीलगत आलेल्या विद्युत तारांचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेस महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनी, चोपडा याचे संबंधित अधिकारी आणि कमर्चारी जबाबदार असल्याची फिर्याद मयत महिलेचा चुलत भाऊ विजय अशोक खजुरे (वय ३१, रा. शेतपुरा, चोपडा) यांनी दिली आहे. त्यानुसार चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार