अचानक मुसळधार पाऊस सुरु होताच सुरक्षित ठिकाणी पळत जात असलेल्या दोन शेतमजूर महिलांवर वीज पडल्यानं दोघांच्या मृत्यू.

Spread the love


जळगाव जिल्ह्यात आज जोरदार पावसानं हजेरी लावली. भुसावळ तालुक्यातील वरणगावात शेतात वीज पडल्यानं दोन शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत.
प्रतिनिधी l वरणगाव :-
(ता. भुसावळ) सुसरी शिवारात शेतात वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या दोन शेतमजूर महिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.२६) दुपारी घडली आहे. यात अन्य एक महिला जखमी झाली असून मृत महिलेचा पती थोडक्यात बचावला आहे. मिनाक्षी रविंद्र तळेले (वय ३४) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (३३) अशी मृत महिलांची नावे आहेत.

सुसरी (ता. भुसावळ) येथील शेत शिवारात मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कोरडे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात होते. शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले हे मिनाक्षी रविंद्र तळेले वय व अनिता उर्फ ममता विनोद पाटील या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात कामे करीत होते. अचानक दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली.

अनिता उर्फ ममता पाटील व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळल्याने या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेजारील शेतात काम करणाऱ्या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५) यांना झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. रविंद्र तळेले हे त्या महिलांपासून काही अंतरावर असल्याने सुदैवाने ते बचावले. पोलिस पाटील नितिन पाटील यांच्या खबरीवरुन वरणगाव पोलिसांत अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार