म्हसावद :- दुचाकीने जात असताना अचानक गाडीसमोर कुत्रा आडवा आला. यामुळे दुचाकीचा ब्रेक दाबल्याने गाडी घसरल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला.हि घटना म्हसावद (ता. जळगाव) फाट्याजवळ घडली.चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे.
चित्राबाई या परिवारासह अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथे वास्तव्यास होत्या. ३० सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास त्या मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने जात होत्या. त्यावेळी दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या. दुचाकीसह घसरत जावून आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दोन्ही मुले झाली पोरकी
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत झालेल्या महिलेच्या पतीचे दोनच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या अंतराने मातृ-पितृ छत्र हरपून त्यांची दोन्ही अपत्य अनाथ झाली आहेत.






