धनबाद (झारखंड):- कोणत्याही लव्हस्टोरीत प्रेम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेम नसेल तर ते आकर्षण किंवा वासनेची भूक समजली जाते. अशा प्रकारच्या लव्हस्टोरीजचे परिणाम अनेकदा भयंकर घडतात.झारखंडच्या कोयलांचलमधील धनबादमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. येथे शहरातील श्रीराम प्लाझा येथे सुरू असलेल्या टाटा म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात ब्रँच मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 44 वर्षांच्या व्यक्तीचे त्याच्या 22 वर्षीय सहकारीशी प्रेमसंबंध जुळले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा म्युच्युअल फंडच्या ऑफिसमधील ब्रॅंच मॅनेजर नीरज आनंद आणि कॉम्प्युटर ऑपरेटर निशा कुमारी यांच्यात काही वर्षे प्रेमसंबंध होते. ब्रँच मॅनेजरची निशासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र घरच्यांच्या दबावामुळे तिने नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडणंही झाली. यादरम्यान, निशाच्या घरच्यांनी तिचे दुसऱ्या शहरात लग्न लावून दिले. यानंतर तिने ऑफिसला जाणंही बंद केलं.
निशा कुमारी हत्याकांड प्रकरण
निशा कुमारीचे वडील दीपक भगत यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निशा काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. रविवारी (21 जानेवारी) मैत्रिणीच्या लग्नासाठी खरेदीला जायचं आहे असं तिने सांगितलं होतं. यावेळी वडिलांनी तिला दुचाकीवरून शहरातील बँकेच्या वळणावर सोडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी बनमोड पोलीस ठाण्यात निशा गायब झाल्याचीही तक्रार नोंदवली होती. पण दुसऱ्याच दिवशी टाटा म्युच्युअल फंडाच्या कार्यालयात निशाचा मृतदेह सापडला.
दीपक भगत (निशाचे वडील) यांना निशा आणि ब्रँच मॅनेजर नीरज आनंद यांच्यातील प्रेमसंबंधाविषयी माहित होतं. हे सर्व तोच करू शकतो अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी पोलिसांकडे नीरज आणि त्याचा साथीदार राहुलवर संशय व्यक्त केला. दुसरीकडे या घटनेनंतर नीरज फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिकच वाढला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नीरजचा शोध सुरू केला आणि त्याला सोमवारी (22 जानेवारी) अटक करण्यात आली.
निशा आणि नीरज यांच्यात नेमकं घडलं तरी काय?
या हत्या प्रकरणाचा खुलासा करताना डीएसपी कायदा आणि सुव्यवस्था अरविंद कुमार बिनहा यांनी सांगितले की, धनबाद पोलीस स्टेशन परिसरातील मनीतंड येथे राहणारी 22 वर्षीय निशा कुमारी हिची हत्या टाटा म्युच्युअल फंडचा ब्रँच मॅनेजर 44 वर्षीय नीरज आनंद याने केली. दोघांमधील प्रेमसंबंध हे हत्येचे कारण होते. निशाच्या लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाला होता.नीरजने निशाला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. रविवार (21 जानेवारी) असल्याने ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं. येथेच त्याने निशाचा चाकूने वार करून खून केला. आरोपी नीरजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






