चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्याने सततची नापिकी,डोक्यावर कर्जाचा बोजा, या विवंचनेतून घेतला टोकाच्या निर्णय.

Spread the love

चाळीसगाव :- शेतात मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. बियाणे, खत वापरून यानंतरही सतत नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना १८ फेब्रुवारीला घडली. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील रहिवासी वाल्मीक पोपट पाटील (वय ४१) यांची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते.

सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर बॅंकांसह बचत गटांचे कर्ज झाले होते. शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न मिळत नसल्याने ते हताश झाले होते. परिस्थिती बदलेल म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांची सतत समजूतही घातली जात होती. अखेर वाल्मीक पाटील यांनी १८ फेब्रुवारीला दुपारी घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरी आलेल्या मुलीला बसला धक्का

काही वेळानंतर त्यांची मुलगी घरी आली असता, तिला वडिलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ तिचे काका समाधान पाटील यांना सांगितल्यानंतर ते धावत कुटुंबासह घरी आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार नरवाडे तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार