पारोळा :- मागील काही वर्षात शेतीसाठी काढलेले कर्ज वाढतच आहेत. यात सततची नापिकी व अतिपावसामुळे यंदा देखील उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे; या विवंचनेत शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना २२ सप्टेंबरला दुपारी उघडकीस आली. पारोळा तालुक्यातील हिरापूर येथील शेतकरी महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

चपलांवरून लागला तपास
सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. गावातील हिलाल श्रावण भील, अशोक रुमाल भील यांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






