एरंडोल:–तालुक्यात दिनांक ११ जून, २०२५ रोजी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने शेती, घरे, गोठे यांसह अन्य निवाऱ्याचा साधनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एरंडोल तालुक्यातील मौजे रिंगणगांव येथील कै. जगन्नाथ श्रावण रोहिमारे हे घराची भिंत पडून तर मौजे फरकांडे येथील कै. नारायण सीताराम पाटील हे घराची पत्रे मयत झाले होते.
दिनांक ११ जून, २०२५ रोजी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने खूप मोठे नुकसान झाले होते. यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, घरांची पडझड, रस्त्यांवर झाडे पडून दळणवळण ठप्प, विजेचे पोल पडून विद्युत पुरवठा खंडित, पशुधन दगावले यांसह जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार अमोल पाटील यांना केल्या होत्या तसेच दुसऱ्या दिवशी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केली होती. या नुकसानीसह मौजे रिंगणगाव येथील कै.जगन्नाथ श्रावण रोहिमारे यांचा व कै.नारायण सीताराम पाटील यांचा मृत्यू झाला होता. दोनही मयत व्यक्ती हे कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्यांचेवर अवलंबून होती. यावेळी त्यांचा निधनाने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती परंतु आमदार अमोल पाटील यांनी या कुटुंबांच्या सांत्वन भेटीवेळी कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासित केले होते.
कुटुंबांचा मदतीसाठी आमदार अमोल पाटील सातत्याने पाठपुरावा करीत होते. या तत्परतेमुळे कै.जगन्नाथ श्रावण रोहिमारे यांच्या पत्नी पुंजाबाई जगन्नाथ रोहिमारे व कै.नारायण सीताराम पाटील यांचा मुलगा गजानन नारायण पाटील या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान व प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तहसिलदार प्रदीप पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,निवासी नायब तहसिलदार संजय घुले, नायब तहसिलदार दिलीप पाटील उपस्थित होते.