
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत जाहीर पत्रातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मनसेच्या पाडवा मेळाव्यात, त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये आणि दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यासंदर्भात सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यात औरंगाबादमधील सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधा गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी आता जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1521498072517582849?s=20&t=Rtn1r3O4_PWAZv4cTGDmKQ
“आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल”, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून दिला आहे.
“भोंग्यांचा त्रास त्यांनाही समजू दे”
“देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही”, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.
“पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवून द्यावं!”
दरम्यान, आपल्या पत्रातून राज ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवणाऱ्या पोलिसांनाच आवाहन केलं आहे. “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा”, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.