
शिरपुर :- सध्या अपघाताचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरपूर जवळ सावळदे गावाजवळ भरधाव वेगातील ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने आई आणि मुलाला चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली.


मध्य प्रदेशातील वरला तालुक्यातील कुंडिया येथील रहिवासी राला खुमाण गोथरे हे कुटुंबासह मालेगाव जवळील उमराणा येथे मजुरीच्या कामासाठी आले होते. ते रविवारी पत्नी राधा राला गुथरे (वय २७) व मुलगा आदित्य यांच्यासह मोटारसायकलने (एमपी-४६-एमएस-९९९६) उमराणा येथून कुंडिया ता. वरला येथे जात होते. त्या वेळी मुंबई- आग्रा महामार्गावर सावळदे गावाच्या पुढे शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (एमपी-०७- एचबी-४६५२) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. ट्रकने आदित्य व राधा गुथरे यांना चिरडले. त्यामुळे आदित्यचा जागीच मृत्यू झाला. राधा गुथरे यांचा धुळे येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला.











