
पारोळा :- शेतात कचरा टाकल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबामध्ये वाद झाला. यात कचरा टाकणाऱ्या लोकांनी तिघांवर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार शनिवार 18 जून रोजी पारोळा तालुक्यात उघडकीस आला. या झालेल्या हल्ल्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. रात्री पोराळा पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पनाबाई शिवाजी पवार, रोहीत शिवाजी पवार व शिवाजी विक्रम पवार या तिघांनी तामसवाडी येथील संजय रमेश पवार यांच्या शेतात कचरा टाकला. यामुळे संजय पवार यांनी जाब विचारल्यावर याचा राग आल्याने कल्पनाबाई, रोहित व शिवाजी या तिघांनी चॉपर, दांडे घेऊन संजय पवार यांच्यावर हल्ला केला.
गुन्हा दाखल
संजय पवार यांच्या कुटुंबातील राजेंद्र रमेश पवार व रमेश बाबुराव पवार असे तिघे जखमी झाले. त्यांच्यावर चॉपर, दांडा, पावड्याने हल्ला केला. राजेंद्र पवार यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवर चॉपरने गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना ताडतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोघांवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वैशाली पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड हे पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.