आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे तयार होत असलेल्या रंगार खिडकी ते गांधी पुरा पुलाचे काम प्रगती पथावर-

Spread the love


अनेक दिवसांपासून होती मागणी,नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार.- झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल :- आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे सुरू असलेल्या अंजनी नदीवर बांधण्यात येणा-या रंगारी खिडकी ते गांधीपुरा या भागांना जोडणा-या पुलाचे काम वेगाने सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या पुलाच्या बांधकामामुळे शहर आणि गांधीपुरा भागातील नागरीक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला आहे.

पालिकेने देखील पुलासाठी सुमारे चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत.अंजनी नदीवर बांधण्यात येणारा नवीन पूल गाव आणि गांधीपुरा या भागांना जोडण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.यापूर्वी नदीवर लहान फारशी असल्यामुळे गांधीपुरा आणि गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.नदीवरील लहान फारशीवरून मोटर सायकल देखील नेतांना अडचण निर्माण होत होती.पावसाळ्यात फरशीवर शेवाळ होत असल्यामुळे नागरिक पाय घसरून पडत होते.पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिक जीव मुठीत घेवून फरशीवरून ये जा करीत असल्यामुळे नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी अनेक वर्षांपासून नागरिक मागणी करीत होते.

नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेवून आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.पुलाच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च येणार असल्यामुळे शासनाने तीन कोटी रुपये मंजूर केले होते.नगरपालिकेने देखील चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुलाचे बांधकाम वेगाने सुरु झाले आहे.दिवाळीपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या पुलाच्या बांधकामामुळे गाव आणि गांधीपुरा भागातील नागरिकांची वेळेची बचत होणार असून अंतर देखील कमी होणार आहे.

या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ भाजप आणि शिवसेना यांनी दोन वेळेस स्वतंत्रपणे केला होता.त्यामुळे श्रेय घेण्याच्या वादात पुलाचे बांधकाम रेंगाळले जाण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती.मात्र राजकीय मतभेद बाजूला सारून भाजप व तत्कालीन सेनेच्या पदाधिका-यांनी गावाच्या विकासासाठी सामंजस्याची आणि विकासासाठी विरोधाची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे पुलाचे बांधकाम वेगाने सुरु आहे.पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

चौकट :- आमदार चिमणराव पाटील

अनेक दिवसांपासून गांधी पुरा ते गावाला जोडणाऱ्या पुलाची मागणी नागरिकांनी केली होती. फार कमी वेळेत या पुलाची शासना कडून परवानगी आणून पुलाच्या कामाचा मुहूर्त चा शुभारंभ करून कामास जलद गतीने सुरुवात करून लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासीयांनी करता या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल

आपण या बातम्या वाचल्यात का?


टीम झुंजार