अमळनेर : तालुक्यातील सात्री येथे दोनवेळा तलवार घेऊन फिरणाऱ्या धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथील रामकृष्ण दिलीप काटे याला मारवड पोलिसांनी शस्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बोरी नदीला पूर आल्यानन्तर सात्री गावाचा संपर्क तुटतो म्हणून महेंद्र बोरसे यांच्या आंदोलनानंतर शासनाने पर्यायी रस्त्यासाठी सीमांकन केले.
बऱ्याच शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याने त्यांच्या ताब्यातील जमीन जाईल याचे वाईट वाटून संदीप सुरेश पाटील याने महेंद्र बोरसे याच्याशी वाद घातला होता. २३ रोजी संदीप याचा शालक रामकृष्ण दिलीप काटे (बिलखेडा) याने मोटरसायकलवर तलवार आणली होती. महेंद्र बोरसे यांच्या जीवाला धोका होता म्हणून गावातील काही लोकांनी समजूत घालून रामकृष्ण काटे याने माफी मागितल्याने प्रकरण मिटले होते.
परंतु २ रोजी रामकृष्ण काटे पुन्हा सात्री येथे तलवार घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने महेंद्र बोरसे ,सुनील पाटील , मनोहर बोरसे यांनी पाळत ठेवली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या पात्रात रामकृष्ण मोटरसायकलला कपड्यात गुंडाळलेल्या तलवारीसह आढळून आला. त्याला पकडून मारवड पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. सहाययक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.