नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारतांना विजेचा जोरदार शॉक लागून महिलेचा मृत्यू, नवीन घरात जाण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण.

Spread the love

वर्धा :- नवीन घराचे बांधकाम सुरु होते. भिंती बांधल्या गेल्याने या बांधकामावर पाणी मारण्यासाठी महिला गेली होती. पाणी मारत असताना महिलेला विजेचा जोरदार झटका बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.सदरची घटना आष्टी तालुक्यातील भारसवाडा गावात घडली असून घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

भारसवाडा (ता. आष्टी) येथील संगीता पन्नासे असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. भारसवाडा येथील राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे. राजेंद्र पन्नासे यांना तीन महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या मंजूर घरकुलाच्या बांधकामला सुरवात करण्यात आली होती. घराचे काही काम झाले आहे. यामुळे बांधकाम पक्के होण्यासाठी पन्नासे दाम्पत्य नियमित पाणी मारत असतात.

पाणी मारताना झाला घात

दरम्यान आज सकाळी संगीता यांनी हॉटेल उघडले. यानंतर पती राजेंद्र यांना दुकानात बसवून त्या नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या. पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि काळाने डाव साधला. हात लावला त्या ठिकाणी वीजपंपाची वायर होती. यामुळे वीजेचा झटका लागताच संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजारी महिलांना माहिती झाली. त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला.

पत्नीच्या मृत्यूची बातमी एकताच पती बेशुद्ध

नविन घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले. गावकऱ्यांनी त्यांना धीर देत शुद्धीवर आणले. यानंतर राजेंद्र हे तत्काळ बांधकामस्थळी पोहचले. वीज पुरवठा बंद केला. यानंतर संगीता यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता संगीताला मृत घोषीत केले. या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी