“तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात त्यांना घर नाही आहे का?” पतीने पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून केला खून.

Spread the love

सांगली:- जत तालुक्यातील रेवनाळ येथे किरकोळ कारणावरून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रुक्मिणी विलास खांडेकर (वय-३५) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.याप्रकरणी पती विलास विठोबा खांडेकर (वय-४२, रा- रेवनाळ, ता- जत) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विलास बापू सरगर (रा- कोळे) यांनी जत पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेवनाळ येथील विलास खांडेकर यांने दारू पिल्यानंतर पत्नी रुक्मिणी हिने तुम्ही दररोज दारू का पिऊन येता? अशी विचारणा केली. संशयित विलासने ‘तुझ्या माहेरचे लोक माझ्या घरी का येतात. त्यांना घर नाही का? असं म्हणत शिवीगाळ केली. रुक्मिणीने ‘माहेरच्यांना का शिवीगाळ करता’ अशी विचारणा केली. दोघांत वाद झाला. विलासने ‘तुला जिवंत ठेवत नाही’ अशी धमकी दिली.मध्यरात्री रुक्मिणी झोपली असता विलासने डोक्यात दगडी वरवंटा घातला.

ती गंभीर जखमी झाली. मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुक्मिणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रुक्मिणीच्या मृत्यूनंतर विलासवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यास अटक केली.

मुख्य संपादक संजय चौधरी