एरंडोल (विशेष प्रतिनिधी): – एरंडोल ते धरणगाव जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे शेकडो खड्डे अनेक दिवसांपासून पडलेले असून या कडे कोणाचेही लक्ष जात नसून सदर खड्डे त्वरित बुजवून मिळावे किंवा या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.
एरंडोल ते धरणगाव अंतर १२ किलोमीटर आहे.जळगाव जिल्ह्यातील हे दोन तालुके असून दररोज या दोन्ही तालुक्यातील लोक आपली काम करण्यासाठी व काही व्यवहार करण्यासाठी दररोज ये जा करीत असतात.परंतु गेल्या काही दिवसांपासून एरंडोल येथील धरणगाव चौफुली पासून ते टोळी येथील मारोती मंदिरा पर्यंत जवळपास सहा ते सात किलो मीटर रस्ता खूपच खराब झाला आहे.
दरम्यान एरंडोल येथील धरणगाव चौफुली ते दरगाह पर्यंत सुमारे दोन किलो मीटर रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून त्यानंतर दरगाह पासून ते चिंध्या देव महाराज मंदिरापर्यंत काही दिवसांपूर्वी नूतनीकरण करण्यात आलेला सुमारे ५०० मीटर रस्ता ठीक आहे.त्यानंतर चिंध्यादेव महाराज मंदिरा पासून ते टोळी येथील मारोती मंदिरा पर्यंत जवळपास चार ते साडे चार किलो मीटर रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्यावर चार ते पाच फूट लांबीचे खड्डे पडले आहेत.याच रस्त्यावर एक इंग्रजी माध्यम असलेली मोठी शाळा आहे.दररोज शेकडो विद्यार्थी,पालक या रस्त्याने ये जा करत असतात.
या रस्त्यावरील वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते.प्रसंगी या ठिकाणी छोटे – मोठे अपघात देखील होत आहे.वाहन चालकांची भांडणे देखील काही वेळेस होतात. ऐन पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून लवकरात लवकर सदर रस्त्याचे नूतनीकरण अथवा या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी जोर धरत आहे.