जालना:- निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क स्वतःच्या पतीचे निधन झाल्याचा बनाव एका महिलेने केला आहे. आपल्या पतीचा मृत झाल्याची खोटी कागदपत्र ही सादर केली. त्यानंतर या महिलेने एक दोन नाही तर तब्बल 8 वर्ष या निराधार योजनेचा लाभ घेतला. पण यात खरा ट्वीस्ट पुढे होता. या महिलेच्या पतीचा मृत्यू झालाच नव्हता. तिचा पतीच आता समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
ही घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगावमध्ये घडली आहे. विधान आणि निराधार महिलांना सरकार मार्फत अनुदान दिले जाते. हे अनुदान मिळावे म्हणून एका महिलेने चक्का आपल्या पतीचे निधन झाले असल्याचे दाखवले. त्यात पात्र ठरून त्या गेल्या आठ वर्षापासून हे अनुदान घेत आहेत. विशेष म्हणजे गेली आठ वर्ष ही महिला आपल्या पती बरोबरच राहात होती. पण तिला आपल्या मृत्यूनंतरचे अनुदान मिळत आहे याची खबर तिच्या पतीला नव्हती.ज्यावेळी त्याला ही माहिती मिळाली त्यानंतर त्या महिलेच्या पतीला धक्काच बसला. भिकाजी गाडे असं या पतीचे नाव आहे. त्यानंतर त्याने तातडीने घनसांवगी तहसीलदारांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. आपण जिवंत असल्याचं ही त्यानी सांगितले आहे. शिवाय आपला मृत्यू झाल्याचे आपल्या पत्नीने खोटेच सांगितले. शिवाय त्यातून अनुदान मिळवले असा दावा ही गाडे यांनी केला आहे. त्यामुळे तिचे अनुदान तातडीने बंद करावे अशी मागणी ही त्यांनी निवेदनातून केली आहे.या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे पती पत्नी एकत्रच राहात होते. दोघे ही जेष्ट नागरिक आहेत. पण त्यांच्यात झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असं बोललं जात आहे. त्यातूनच पतीने पत्नीची तक्रार केली आहे. शिवाय आपण जिवंत असल्याचं ही सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून मिळालेले अनुदान सरकार या महिलेकडून कसे वसूल करणार हा आता खरा प्रश्न आहे. शिवाय पतीने केलेला दावा कितपत खरा आहे याची ही प्रशासनाला चौकशी करावी लागणार आहे