नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या 35 व्या दिवशीच गळफास घेऊन संपविले जीवन, सासरच्या चौघांना अटक.

Spread the love

नागपूर :- राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु असताना नागपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपूरमध्ये एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिने लग्नाच्या ३५ दिवसांतच आत्महत्या केली.२५ एप्रिल २०२५ रोजी मयुरीचा विवाह अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या आनंदाने पार पडला. पण लग्नाच्या काहीच दिवसांत तिचे आयुष्य दु:खाच्या आणि अत्याचाराच्या चक्रव्यूहात अडकले. सासरच्यांनी लग्नात अपेक्षित खर्च न केल्याचा राग मनात धरून मयुरीकडे सतत पैशांची मागणी सुरू केली. नवविवाहित असतानाही, अभिषेकचे वडील दीपक डाहुले, आई कुसुम डाहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांच्याकडून मयुरीला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. मयुरीने आधी आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली नव्हती. तिने वाट पाहिली की कदाचित नव्याने सुरु झालेलं हे नातं काही काळानंतर सुरळीत होईल. मात्र माहेरी आल्यावर तिने वडिलांना सत्य सांगितले. वडिलांनी गटाच्या भीशीमधून २० हजार रुपये दिले. पण जाच काही थांबला नाही. अखेर 30 मे रोजी मयुरीन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले आणि बहीण आदित्य डाहुले यांना अटक केली आहे, पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात अशा घटना चिंताजनक वेगाने वाढत आहेत. वैष्णवी हगवणे घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन आणि समाजाच्या माध्यमातूनच जातीच्या भावना अत्यंत गांभीर्याने व्यक्त केल्या जात आहेत. हुंडा ही प्रथा कायद्यानुसार गुन्हा असूनही, ती अजूनही अनेक ठिकाणी पाळली जात आहे. लग्नानंतर काही दिवसांतच नवविवाहित महिलांवर मानसिक आणि शारीरिक विश्वासघात केला जातो, कधीकधी थेट खूनाच्या स्वरूपात तर कधीकधी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये. महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी केवळ कायदेच नव्हे तर समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढण्याची गरज आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी