तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.

Spread the love

अहिल्यानगर :- प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या तपासातून उघडकीस आली आहे. सुरूवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विश्वजीत पोटे व संकेत बंडाले यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत तरूणाच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) शिवारातील हॉटेल रायबा समोर ही घटना 30 मे रोजी सायंकाळी घडली. आदेश नंदू घोरपडे (वय 22, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) हा आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय 20, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना त्यांचा बुलेट वरून पाठलाग केला जात होता. बुलेट वरील आरोपींनी अमर सुभाष पोटे यास फोन केला व आदेश घोरपडे हा कुठपर्यंत आलाय, या बाबत माहिती दिली.

तसेच पिकअपवरील अमर यास घोरपडे यास उडविण्यास सांगितले. टाकळी काजी गावच्या शिवारातील हॉटेल रायबाचे समोर घोरपडे व त्याचे मित्रास उडविले. त्यात घोरपडे याचा मृत्यू झाला होता. मोहित निमसे हा जखमी झाला.मोहित निमसे याने या प्रकरणी 2 जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.

यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी सांगितले की, आदेश घोरपडे याचे बीड जिल्ह्यातील दादेगाव (ता. आष्टी) येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत ठरवले होते. याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर चार मित्रांसह 30 मे रोजी दादेगाव गाठले. तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर घोरपडे व निमसे दुचाकीवरून पळून आले, तर त्यांचे इतर मित्र चारचाकीने परतले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात पोलिसांनी विश्वजीत सुभाष पोटे (वय 25) आणि संकेत बाळासाहेब बंडाले (वय 27, दोघे रा. दादेगाव) तसेच अमरसिंह सुभाष पोटे व धनंजय सुभाष फुंदे दोघे राहणार दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड अशा एकूण चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असून आणखी आरोपीतांचा कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले.

मुख्य संपादक संजय चौधरी