एरंडोल | प्रतिनिधी :- एरंडोल तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळात रिंगणगाव फरकांडे येथे भिंत कोसळून दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तालुक्यात विविध ठिकाणी पाळीव प्राणी देखील मृत्युमुखी पडल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत
सविस्तर वृत्त असे की दिनांक 11 जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक किरकोळ पावसासह सुसाट्याचा वारा सुरू झाला वादळ एवढे भयानक होते की नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. यात शहरासह तालुक्यातील अनेक घरांची पत्रे उडाली शेकडो झाडे जमीनदोस्त झाली इलेक्ट्रिक पोल तारा जमिनीवर आल्या.अनेकांच्या सोलर प्लेट उडून गेल्या.वाऱ्याचा वेग एवढा होता की नॅशनल हायवेवरील दिशादर्शक फलक देखील जमीनदोस्त झाले.यामुळे हायवे वरील रहदारी काही वेळ ठप्प होती तसेच धरणगाव रस्त्यावर झाडे कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत रहदारी बंद होती.
नारायण सीताराम पाटील (६८) राहणार रिंगणगाव व गोपाळ मोतीराम पाटील (वय ७५) राहणार फरकांडे या दोन्ही वयोवृद्धांना घराची भिंत कोसळल्याने आपला जीव गमवावा लागला तसेच जवखेडा बुद्रुक येथे एक गाय व म्हैस यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने व उमरदे येथेही चार म्हशी भिंतीखाली आल्याने मृत्युमुखी पडल्या महसूल विभागाकडून पंचनामे वेगाने होत असल्याचे नायब तहसीलदार संजय जी घुले यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान या वादळामुळे महावितरणचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे समजते तालुक्यात शेकडो विजेचे खांब जमीनदोस्त झाले असून अनेक तारा तुटल्या आहेत तसेच इलेक्ट्रिक पोल वरती झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गेल्या 18 तासापासून तालुक्याची बत्ती गुल होती वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांचे शर्तीचे प्रयत्न करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करून संध्याकाळ पर्यंत परिसरातील काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला.सर्व ठिकाणी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन महावितरणचे अधिकारी जयदीप आर पाटील यांनी दिले आहे.