एरंडोल | प्रतिनिधी – एरंडोल येथील धरणगाव चौफुलीजवळील धरणगाव कडे वळण्यात येणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. उड्डाणपुलाच्याखाली वळणावर असलेल्या रस्त्यावर खोदण्यात आलेल्या जिवघेण्या खड्ड्यात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रकचे चाक अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत असून देखील प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.खड्डयामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवित अथवा वित्तहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्ता असणा-या धरणगाव चौफुलीजवळ पालिकेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी अनेक दिवसांपासून खड्डा खोदण्यात आला असून खड्ड्याभोवती कोणताही सुचनाफलक अथवा संरक्षणाची उपाययोजना करण्यात आलेली नाही.खड्ड्याचा कोणताही अंदाज येत नसल्यामुळे याठिकाणी अनेकवेळा किरकोळ अपघात झाले आहेत.आज सकाळी सात वाजेच्या सुमारास धरणगावकडून भरधाव वेगाने येणा-या ट्रकचालकास खड्ड्याचा कोणताही अंदाज न आल्यामुळे ट्रकचे चाक जिवघेण्या खड्ड्यात अडकले.ट्रकचे चाक खड्ड्यात अडकल्यामुळे वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.क्रेनच्या सहाय्याने सुमारे अर्ध्यातासांच्या प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला.ट्रकचालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
रस्त्यावरील खड्डा त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी
नागरिकांनी केल्यानंतर देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.खड्ड्यामुळे मोठा अपघात अथवा दुर्घटना होऊन जीवित किंवा वित्तहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील रहिवाशांसाठी हाच प्रमुख मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असते.उड्डाणपुलाच्या खाली पथदिवे नसल्यामुळे सर्वत्र अंधार राहत असल्यामुळे खड्ड्याचा अंदाज वाहन चालकाना येत नाही त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे.पुलाखाली अंधार राहत असल्यामुळे मद्यपींसह अन्य नशा करणा-यांसाठी सुरक्षित ठिकाण बनले आहे.पुलाखालील अंधारामुळे तसेच याठिकाणी असलेल्या मद्यपींच्या उपस्थितीमुळे महिला व विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
उड्डाणपुलाखाली विविध व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु केल्यामुळे वाहतुकीचीची समस्या निर्माण होत असतांना देखील पोलीसप्रशासनासह न्हाई,सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे
पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.पोलीसस्थानकापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाखाली बेशिस्तपणे वाहने पार्किंग केले जात असल्यामुळे शालेय विद्यार्थी व महिला त्रस्त झाल्या आहेत.पुलाखाली रस्त्यावर पार्किंग करण्यात येणा-या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
उड्डाणपुलाखालील अतिक्रमणधारकांना न्हाईच्या ठेकेदाराच्या एका
कर्मचा-याकडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संरक्षण दिले जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहेत.पुलाखालील अतिक्रमणाबाबत न्हाईसह सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकल्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत प्रशासनाने दखल घेवून जीवघेणा खड्डा बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे.