जमिनीत पुरलेले साडेचार लाखांचे ३३ मोबाईल हस्तगत!
जळगाव :- जिल्ह्यात आठवडे बाजारासह गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह टोळीचा म्होरक्या तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३) याला ताब्यात घेतले असून, स्वामीनारायण मंदिराजवळील निर्जनस्थळी एका झाडाच्या पायथ्याशी जमिनीत गाडून ठेवलेले सुमारे साडेचार लाखांचे ३३ मोबाईल या टोळीने काढून दिले आहे.जळगाव शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: शनिवारच्या आठवडी बाजारामधून किमान दहा मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या. यावर नियंत्रणासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी शनिवारच्या (ता. २१) बाजारात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवून पोलिस ठाण्यातील एक वाहन नागरिकांना आवाहन करण्यासाठी तैनात केले होते.
उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, रतन गिते यांच्या पथकाला दोन लहान बालके संशयितरीत्या आढळून आले. पथकाने या मुलांवर लक्ष केंद्रीत करुन नेमक्या वेळेस त्यांच्यावर झडप घातली. टोळीचा म्होरक्या तरुण नोरसिंग गुजरियासह तिघांच्या अंगझडतीत चार चोरीचे मोबाईल मिळून आले. तिघांना पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली.
अखेर पोलिस चौकशीत चोरीच्या मोबाईलची माहिती दिली. त्यात हे सर्वजण नशिराबाद रस्त्यावरील स्वामीनारायण मंदिराजवळील झोपडी (पाल) टाकून राहत असल्याचे समजले. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ते राहत असलेल्या शेतात झाडाच्या पायथ्याशी जमिनीत खड्डा खोदून एका पिशवीमध्ये मोबाईल गाडून ठेवले आहेत, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी शेतातील एका झाडाजवळ जमिनीत खड्डा करून पुरुन ठेवलेले ३३ मोबाईल हस्तगत केले.
रावेरमधून चोरले आठ मोबाईल
संशयितांनी रावेरमधून आठ मोबाईल चोरले. हे मोबाईल रावेर पोलिस ठाण्याचे अंमलदार महेश मोगरे यांच्या ताब्यात दिले आहेत. संशयिताला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयाच्या आदेशाने पोलिस काेठडी देण्यात आली आहे. पोलिस नाईक हेमंत जाधव तपास करीत आहेत. हे चोरटे बाजारात कशा पद्धतीने चोरी करायचे, याचे प्रात्यक्षिकही पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी चोरट्यांकडून करवून घेतले.