मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठीचे शंभर धावांचे लक्ष्य भारताने १९.५ षटकांत ४ बाद १०१ धावा करीत साध्य केले. विजयासाठी निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल (९ चेंडूंत ११) चौथ्या षटकात बाद झाला. त्यानंतर इशान किशन (३२ चेंडूंत १९) धावबाद झाला. अकराव्या षटकात ईश सोधीने राहुल त्रिपाठीला (१८ चेंडूंत १३) झेलबाद केले. १०.४ षटकांत भारताची अवस्था ३ बाद ५० अशी झाली. वॉशिंग्टन सुंदर (९ चेंडूंत १०) धावबाद झाला. ७० धावांत चार फलंदाज गारद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (३१ चेंडूंत नाबाद २६) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (२० चेंडूंत नाबाद १५) यांनी भारताचा विजय साकार केला.
पण खरंतर भारतीय संघानेच विजय कमालीचा अवघड बनवला.त्याआधी, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉन्वे धडाकेबाज सुरुवात करणार, असे वाटत असतानाच अॅलन (१० चेंडूंत ११) तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. विशिष्ट अंतराने फलंदाज बाद होत राहिले.

न्यूझीलंडला निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने संघात कोणताही बदल केला नाही. भारतीय संघाने उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली.सूर्यकुमार यादवला (३१ चेंडूंत नाबाद २६) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना १ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. भारत ह्या सामन्यासह मालिका जिंकणार का ह्याचे उत्तरही मिळणार आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम