मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाची सुरूवात केली. पाचव्या षटकात अर्धशतकी भागीदारी करत रोहित बाद झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३३ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा अकील हुसेनने उध्वस्त केला. अवघ्या काही चेंडूंनंतर अल्झारी जोसेफने सुर्यकुमार यादवला २४ धावांवर पायचीत टिपले. दीपक हुडाने चांगली सुरूवात केली पण अल्झारी जोसेफने त्याला २१ धावांवर बाद केले. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन काही षटकं एकत्र खेळतील असं वाटत असतानाच ओबेद मेकॉयने पंतला ४४ धावांवर बाद केले. दिनेश कार्तिकलाही केवळ ६ धावांवर ओबेद मेकॉयने तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या दोन षटकांत केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली आणि भारताने २०व्या षटकाच्या अखेरीस १९१/५ अशी दमदार धावसंख्या उभारली.
वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी ब्रँडन किंग आणि काईल मेयर्स यांनी केली. पण आवेश खानने ब्रँडन किंगला १३ धावांवर स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. डावाच्या ४थ्या षटकात आवेश खानने देवॉन थॉमसला १ ह्या धावसंख्येवर बाद केले. कर्णधार निकोलस पुरन तुफान टोलेबाजी करत होता. अक्षर पटेलच्या एकाच षटकात २२ धावा काढल्यानंतर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसनने त्याला २४ धावांवर धावचीत केले. पुढच्याच षटकात अक्षर पटेलने काईल मेयर्सला १४ धावांवर बाद केले. रावमन पॉवेल आणि शॅमरॉन हेटमायर यांची जोडी जमलेली जोडी अक्षर पटेलने भेदली. त्याने रावमन पॉवेलला २४ धावांवर बाद केले. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ ८२ धावांवर परतला होता.
जेसन होल्डर धावगती वाढवण्याच्या नादात अर्शदीप सिंगच्या जाळ्यात फसला. अकील हुसेनला रवी बिष्णोईने बाद केले. त्याच षटकात धावगती वाढवण्याच्या नादात शॅमरॉन हेटमायर १९ धावांवर बाद झाला. डॉमनिक ड्रेक्स आणि ओबेद मेकॉयला अर्शदीप सिंगने लागोपाठच्या षटकात बाद करत सामना भारताच्या खिशात घातला. वेस्ट इंडिजचे शेवटचे ५ फलंदाज केवळ ५० धावा जोडू शकले. त्यामुळे त्यांची अंतिम धावसंख्या १३२/१० अशी झाली. आणि भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला. मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आवेश खानला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ४ षटकांमध्ये १७ धावा देत २ गडी बाद केले. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला शेवटचा सामना ७ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत (७ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता) ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुवर्ण पदक जिंकण्यासाठी खेळणार आहे.
कांस्य पदकासाठी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ह्यांच्यात सामना दुपारी २:३० वाजता होणार आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






