पद्मालय -२ साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या ३७१ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता – आमदार चिमणराव पाटील

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल – पद्मालय – २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या ३७१ कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मागील आठवड्यात आमदार चिमणराव पाटील नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेवून एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प पळासदड व पद्मालय – २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजना या दोन्ही वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रस्तावांना चालना देणेकामी मागणी केली होती. सातत्याने गेल्या ३ – ४ वर्षापासून अधिकारी वर्गाशी पाठपुरावा करून या दोन्ही प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. मागील आठवड्यात अंजनी मध्यम प्रकल्पाच्या २३२ कोटीच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. आज पद्मालय – २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या ३७१ कोटीच्या सुधारित प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.


पद्मालय – २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजना एरंडोल तालुक्यातील दौलतपूर येथे प्रस्तावित आहे.
या योजनेअंतर्गत गिरणा नदीवरील दहीगांव बंधाऱ्यातून पावसाळ्यातील पुराचे पाणी एम.एस.पाईपाच्या रायझिंग मेन द्वारे उपसा करून पद्मालय – २ येथे धरण बांधून त्यात पाणी साठा करणे व त्याद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. या धरणाची साठवण क्षमता ७०.३६ द.ल.घ.मी. आहे. या धरणातून दोन प्रकारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. एरंडोल तालुक्यातील ३५३३ हेक्टर १६ गावे व धरणगांव तालुक्यातील ५४६७ हे १७ गावांना याचा लाभ मिळणार आहे.

बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे २००० हेक्टर वर एरंडोल तालुक्यातील नागदुली, खेडगांव, खडके बु, पिंपळकोठा खु, चोरटक्की, वरखेडी व धरणगांव तालुक्यातील पथराड खु, पथराड बु व शेरी या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार असून, गिरणा प्रवाही कालवा स्थेर्यीकरण द्वारे ७००० हेक्टर वर एरंडोल तालुक्यातील खर्ची बु, रिंगणगांव, दापोरी, खेडी खु, वैजनाथ, रवंजे, पिंपळकोठा प्र.चा., चांदसर, सावदे, कढोली, खर्ची खु तर धरणगांव तालुक्यातील टाकळी बु, टाकळी खु, पाळधी बु, पाळधी खु, भोकणी, वंजारी, बांभोरी, आव्हाणी, एकलग्न, लाडली, धार, दोनगांव, फुलपाट, चांदसर या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या योजनेमुळे एरंडोल व धरणगांव तालुक्यातील ९००० हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी गेल्या ३ – ४ वर्षापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची हि फलश्रुती आहे.
अंजनी मध्यम प्रकल्प व पद्मालय – २ साठवण तलाव व उपसा सिंचन योजना या दोन्ही प्रकल्पांमुळे एरंडोल तालुका सुजलाम होणार आहे.

मतदारसंघातील या दोन्ही अत्यंत महत्वाच्या प्रकल्पांना भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानले आहेत. तसेच एरंडोल व धरणगांव या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आमदार चिमणराव पाटील यांचावर शुभेच्छांचा , अभिनंदनाचा वर्षाव होत असून आभार व्यक्त केले जात आहेत.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार