VIDEO : दोन हजार किलो शेंदूर हटवल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन पहा व्हिडिओ, फोटो.

Spread the love

सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर; दोन हजार किलो शेंदूर कवच काढले

नाशिक : – खान्देश वासीयाचे आराध्य दैवत असलेल नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते. आता या मूर्तीवरील सुमारे 2 हजार किलो शेंदूर कवच काढण्यात आले आहे.  त्यामुळे आता देवीचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे. पारंपारिक देवी मूर्ती पेक्षा हे स्वरूप वेगळे असून अत्यंत मोहक मूर्ती दिसत आहे.

वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही देवी उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी मानली जाते. कालपासून या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या साठी खुले करण्यात आले होते 45 दिवसात देवी मंदिराच्या भोवती महिरापाचे सुशोभीकरण करताना मूर्तीवरील शेंदूर काढण्याचे काम करण्यात आले.

पुरातत्त्व खात्याच्या नियमाचे आणि निकषांचे पालन करून कोणत्याही रसायनांचा वापर न करता हे काम पूर्ण करण्यात आलं. देवीच्या नव्या स्वरूपात हातातील आयुद्धांत मध्ये प्रचंड बदल झालेला दिसतो यापूर्वी 1768 मध्ये देवी वरचा खोळ म्हणजे शेंदूर पडल्याची ऐतिहासिक नोंद पेशवे दप्तरी आहे त्यानंतर आता प्रथमच शेंदूर काढण्यात आल्याने देवीचे वेगळे आणि मोहक स्वरूप दिसू लागले आहे.

देवी मूर्ती संवर्धन हे अतिशय काळजीपूर्वक पुरातत्त्व संकेतानुसार व निर्धारित कालावधीत नाशिकच्या अजिंक्यतारा कन्सल्टंट्सने पूर्ण केले आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संवर्धन वास्तु विशारद स्मिता कासार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संवर्धक डॉ मॅनेजर सिंग तसेच संचालक योगेश कासार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मूर्तिकार किशोर सोनवणे तसेच सतीश सन्नानसे, समाधान आमले, प्रकाश ठाकरे, गौरव ठाकरे, धनंजय पळसेकर, सिद्धांत वाजे यांनी हे काम पूर्ण केले आहे.

पहा व्हिडिओ :

अलंकारांची सवाद्य मिरवणूक

गुरुवारी सकाळी दहा वाजता आदिमायेच्या आभूषणांचे ट्रस्ट कार्यालयात पूजन होऊन अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. श्री भगवती मंदिरात बहुरंगी फुलांच्या माळांची आरास व त्यात आदिमायेस महावस्त्र परिधान करवून सोन्याचे मोठे मंगळसूत्र, कमरपट्टा, नथ, तोडे, कर्णफुले, चांदीचा मुकुट आदी अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता. दि. ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत श्री भगवतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पुरोहितवर्गाच्या मंत्रोच्चारांत पार पडला. या सोहळ्यांतर्गत विविध धार्मिक पीठांतील विद्वान, धर्मशास्त्र पारांगत श्री गणेश्वरशास्त्री द्राविड (धर्ममार्तंड, वाराणसी), श्री राजराजेश्वर द्राविड, धारवाड (कर्नाटक) यांच्या मार्गदर्शनानुसार शांताराम भानोसे, भालचंद्र शौचे (नाशिक), बाळकृष्ण दीक्षित (त्र्यंबकेश्वर) आणि सप्तशृंगगड येथील पुरोहित संघातर्फे विविध पूजाविधी करण्यात आले. श्री भगवती मूर्तीचे सर्व अवयव साक्षात सप्तशृंगी कलशरुपाने कलशात स्थापित असल्याने सदर कलशाचे गेल्या ४५ दिवसांपासून विधिवत पूजन सुरू होते. बुधवारी (दि. ७) सायंकाळी सातला गडावर कलशाची मिरवणूक काढून गुरुवारी हा कलश मंत्रोच्चारांत विधिवत आई भगवतीस समर्पित करण्यात आला.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार