टी20 विश्वचषक 2022 मधील सर्वात बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत पाकिस्तानला फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. मात्र, सामना सुरू होण्याआधी झालेल्या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांवेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. या राष्ट्रगीताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मागील जवळपास वर्षभरापासून क्रिकेटप्रेमी या सामन्याची वाट पाहत होते. तिकीट विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासात या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. सामन्याच्या काही तास आधीच जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेले हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) खचाखच भरले होते. एक लाखापेक्षा जास्त आसनक्षमता असलेल्या या मैदानावर काही मोजकेच पाकिस्तानी प्रेक्षक दिसत होते.
सामना सुरू होण्याआधी ज्यावेळी भारतीय संघाचे राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा एका सुरात जवळपास एक लाख लोक भारताचे राष्ट्रगीत गाताना दिसून आले. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचवेळी राष्ट्रगीताच्या अखेरीस भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील भावुक झालेला दिसून आला.
या सामन्याचा विचार केला गेला तर भारताने नाणेफेक जिंकून चांगली सुरुवात केली. बाबर आझम व मोहम्मद रिझवान हे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. इफ्तिखार अहमदने शानदार अर्धशतक करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शान मसूदने अखेरपर्यंत नाबाद राहत पाकिस्तानला 159 पर्यंत पोहोचवले. भारतासाठी अर्शदीप सिंग व हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन बळी मिळवले.