होळी खेळताना डोळ्यात रंग गेला तर? गंभीर त्रास, दृष्टी जाण्याचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

Spread the love

Holi 2023 4 ways to protect your eyes this Holi : सणाचा आनंद व मजा यांचे रूपांतर काही जणांसाठी वेदना व दु:खामध्ये होणे दु:खद आहे. कृत्रिम रसायनांपासून तयार केलेल्या रंगांचा डोळे, त्वचा व शरीराच्या अन्य भागांवर किती वाईट परिणाम होतो याची माहिती अनेकांना नसते.

होळी (Holi 2023) साजरी करत असताना आनंदाच्या वातावरणात काही दुखापती आपल्या समस्या वाढवू शकतात. होळी आणि डोळ्यांचा त्रास व डोळ्यांना कायमस्वरूपी होणाऱ्या इजांमागील प्रमुख कारणांपैकी एक झाला आहे. लहान मुलांमध्ये विशेषत्वाने या दुखापती अधिक आढळतात. हा चिंतेचा विषय आहे. डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल्समधील क्लिनिकल सेवांच्या प्रादेशिक प्रमुख डॉ. वंदना जैन यांनी होळी खेळताना डोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सांगितलं आहे.

सणाचा आनंद व मजा यांचे रूपांतर काही जणांसाठी वेदना व दु:खामध्ये होणे दु:खद आहे. कृत्रिम रसायनांपासून तयार केलेल्या रंगांचा डोळे, त्वचा व शरीराच्या अन्य भागांवर किती वाईट परिणाम होतो याची माहिती अनेकांना नसते. बाजारात निकृष्ट दर्जाचे रासायनिक रंग विक्रीसाठी ठेवले जातात. त्याचा डोळ्यांवर हानीकारक परिणाम होतो आणि त्यामुळे काही दीर्घकालीन जटीलता निर्माण होऊन कायमस्वरूपी दृष्टी गमावण्यासारखे गंभीर परिणामही होतात.

कृत्रिम रंग डोळ्यात जातात, तेव्हा डोळ्यांची जळजळ होते, लाल होतात, सुजतात. या हानीकारक रसायनांमुळे अॅलर्जीसारखी रिअॅक्शन येऊ शकते. त्यातून प्रादुर्भाव व अन्य दुखापतीही होऊ शकतात. कृत्रिम व विषारी रसायनांमध्ये औद्योगिक रंग (डायीज) असतात आणि होळीचे रंग तयार करताना त्यात अल्कली मिसळली जाते.

या रंगांमध्ये पारा, अॅस्बेस्टॉस, सिलिका, मायका आणि जस्तासारखी हानीकारक रसायने मोठ्या प्रमाणात असतात. हे पदार्थ विषारी स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे संपूर्ण शरीरासाठी नुकसानकारक असतात. डोळे हे अत्यंत संवेदनशील अवयवांपैकी एक असल्यामुळे अशा हानीकारक रसायनांशी डोळ्यांचा संपर्क आल्यास त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, अगदी कायमचे अंधत्व येण्यापर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.”

पाण्याचे फुगे हा आणखी एक चिंताजनक घटक आहे. लहान मुले पाण्याच्या फुग्यांमुळे होणारे परिणाम न समजल्यामुळे ते एकमेकांवर फेकतात. पाण्याचा फुगा बेसावध स्थितीतील व्यक्तीच्या डोळ्यांवर आदळल्यास त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो आणि डोळ्यांना कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या दुखापती होतात. डोळ्याच्या खोबणींना फ्रॅक्चर झालेले, रेटिना भंगलेले आणि होळीदरम्यान चेहऱ्यावर मारल्या जाणाऱ्या पाण्याच्या फुग्यांमुळे कायमचे अंधत्व आलेले रुग्ण आम्ही बघितले आहेत.

आपण काही प्रतिबंधात्मक उपाय केले, तर होळीदरम्यान डोळ्यांना होणाऱ्या दुखापती टाळणे अगदीच शक्य आहे. आपली मुले रंग खेळताना कोणती उत्पादने वापरत आहेत याची जाणीव पालकांना असणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे आणि रंगांचा उत्सव सुरक्षित व संरक्षित मार्गाने कसा साजरा करावा याबद्दल त्यांच्या मित्रांशी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

सेंद्रीय रंगाचा वापर

आता बाजारामध्ये सेंद्रीय रंग किंवा फुले, हळद व अन्य सेंद्रीय उत्पादनांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे रंग असे अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. हे रंग आपल्या शरीरासाठी नुकसानकारक नसतात. पाण्याचे फुगे डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान करणाऱ्या दुखापतींना कारणीभूत ठरतात. पाण्याच्या फुग्याचा आघात झाल्यामुळे डोळ्यांतून रक्तस्राव होणे, लेन्स निखळणे आणि रेटिना (नेत्रपटल) भंगण्यासारख्या दुखापती होऊ शकतात. या दुखापती सामान्यपणे गंभीर स्वरूपाच्या असतात आणि यातून कायमचे अंधत्व येऊ शकते.

pic for Google

डोळ्यात चुकून रंग गेल्यास, ते चोळू नका

डोळे चोळल्यामुळे पारपटलावर (कॉर्निया) ओरखडे येऊ शकतात किंवा पारपटलाची हानी होऊ शकते. ह्यामुळे डोळ्यांना सं सर्ग व अन्य गुंतागुंतीही होऊ शकतात. जर डोळ्यात चुकून रंग गेला, तर तत्काळ हात साबणाने स्वच्छ धुवा. त्यानंतर ओंजळीत पाणी भरून घ्या आणि डोळा या पाण्यात हलकेच बुडवा. डोळ्यांवर पाण्याचे शिपके मारणे टाळा. कारण, त्यामुळे दुखापत आणखी गंभीर होऊ शकते. डोळ्यांत गेलेले सुक्ष्म घटक काढण्यासाठी रुमाल किंवा टिश्यूपेपर वापरणेही योग्य नाही. कारण, त्यामुळे दुखापत आणखी वाढू शकते.

रंग खेळण्यापूर्वी कॉण्टॅक्ट लेन्सेस काढून ठेवा!

कॉण्टॅक्ट लेन्समध्ये बाष्प शोषून घेण्याचे म्हणजेच हायग्रोस्कोपिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्यामध्ये पाणीही सहज शोषले जाते. म्हणून, डोळ्यांत कोणताही रंग गेल्यास अॅलर्जी व प्रादुर्भावांचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणजे रंग खेळताना चष्मा घालणे किंवा डिसपोजेबल कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरणे. डोळे चुरचुरल्यास या कॉण्टॅक्ट लेन्सेस तत्काळ बाद केल्या जाऊ शकतात.

स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नका!

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या मनाने औषधे घेणे टाळा. डोळ्याला दुखापत झाल्याचे किंवा डोळ्याला हानी पोहोचल्याचे काही लक्षण जाणवत असेल, तर तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांना भेटा. आपण भारतीय नेहमीच घरगुती उपाय करून बघतो किंवा उपलब्ध असलेले कोणतेही आय ड्रॉप्स किंवा ऑइंटमेंट डॉक्टरांचा सल्ला न घेता, डोळ्यांत घालतो. यामुळे दुखापत बरी होण्याऐवजी अधिक गंभीर झाल्याचेच प्रकार बहुतेकदा घडतात. डोळे सतत लाल होत असतील, त्यांतून पाणी येत असेल, खाज सुटत असेल, चुरचुर होत असेल, आघात झाला असेल किंवा रक्तस्राव होत असेल, तर तातडीने नजीकच्या नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवावे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार