Video: शेतकऱ्याच्या घराला लागली आग,दीड लाखांच्या नोटा, सोने, दुचाकी,25 क्विंटल कापूस,धान्य सह इतर सामान जळून खाक, 10ते12 लाख रु.नुकसान

Spread the love


जालना:- शेतकऱ्याच्या घराला आग लागून दीड लाखांच्या नोटा जळाल्याची घटना घडली आहे. घराला लागलेली ही आग एवढी भीषण होती की त्यात या शेतकऱ्याची दुचाकी, सोने, धान्य आणि घरातील सर्व साहित्यांसह संपूर्ण संसार जळून खाक झाला.गोकुळ बमनावत असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येते शेतवस्तीवर गोकुळ बमनावत हे शेतकरी त्यांच्या कुटुंबासह राहतात. सोमवारी ते शेतात काम करत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली.

घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी त्याच्या मदतीला धावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. अखेर या आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला.
या आगीत त्यांनी घरात ठेवलेल्या दीड लाख रुपयांच्या नोटा देखील जळून खाक झाल्या. एवढंच नाही तर आग लागली त्यावेळी घरात असलेला 25 क्विंटल कापूस, एक दुचाकी आणि तीन लाखाचं सोनं देखील जळून खाक झालं. याशिवाय 15 क्विंटल गहू, 10 क्विंटल ज्वारी आणि घरातली इतर सर्व साहित्य देखील या आगीत भस्मसात झालं.

गोकुळ बमनावत यांनी काही दिवसांपूर्वी तूर विकून आलेले पैसे बँकेत जमा केले होते. आता पुन्हा या वर्षी जोमाने शेती करण्यासाठी ते विहिरीत बोर घेणार होते. त्याचं काम देखील सुरु झालं होतं. त्यासाठी त्यांनी बँकेतून दीड लाख रुपये काढून आणले होते. परंतु या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे ते पैसे देखील जळून खाक झाले.
गेल्या वर्षभरापासून केलेली मेहनत एका क्षणात जळून खाक झाल्याने बमनावत यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आहे.या आगीत गोकुळ बमनावत यांच जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचं नुकासान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या जळालेल्या संसाराचा शासनाने पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार