धक्कादायक! दोन अल्पवयीन मैत्रिणी गावातून बेपत्ता, एक घरी आली तर दुसरीच्या मृतदेह विहिरीत आढळला

Spread the love

खून झाला की आत्महत्या केली परिसरात खळबळ

जालना : – तालुक्यातील शंभू सावरगाव या गावाची धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळख आहे. मात्र काल या गावात भयंकर घटना घडली आहे. गावातील बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय मुलीचा मृतदेह काल सोमवारी सकाळी गावातील एका विहिरीत आढळून आल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. पायल मच्छिंद्र जाधव असं या मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील शंभू सावरगाव येथील दोन मैत्रिणी गावातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. बऱ्याच वेळ झाला दोघी घरी न आल्याने कुटुंबियांनी गावात शोध घेतला. मात्र दोघींचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, रात्री उशिरा बेपत्ता झालेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी घरी परत आली. परंतु दुसरी मुलगी घरी परतलीच नाही.
घाबरलेल्या नातेवाईक व गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरूच ठेवला होता. मात्र रात्र उलटून गेली आणि सकाळी गावातील मंदिराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. दुर्दैवाने हा मृतदेह बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय पायल मच्छिंद्र जाधव हिचा असल्याची खात्री पटली. घाबरलेल्या नातेवाईकांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सेवली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतून पायल जाधव हिचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला.
दरम्यान, या मुलीचा खून झाला की तिने आत्महत्या केली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर काय ते स्पष्ट होईल. तोपर्यंत या दोघी मुली नेमक्या कशा बेपत्ता झाल्या, त्या कुठे गेल्या होत्या, या प्रश्नांची उकल करण्यात आता पोलिस गुंतले आहेत.

टीम झुंजार