दुर्दैवी घटना : मुलाला हळद लागली अन् तिकडे रुग्णालयात आईने प्राण सोडले; वऱ्हाड्यांसह सारेच सुन्न

Spread the love

अमळनेर : – गेल्या वर्षभरापासून कर्करोगाने ग्रासल्याने आईची प्रकृती चिंताजनक, मात्र आईची मुलाचे लग्न डोळ्यांनी पाहण्याची इच्छा….मुलाचे लग्न जुळले, अवघ्या दोन दिवसांवर लग्न असताना आईची प्रकृती गंभीर झाली, तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. यावेळी मुलाने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत आईचे रुग्णालयात जाऊन आशीर्वाद घेतले, त्यानंतर व्हिडीओ कॉलवर मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम पाहिला अन् मुलाला हळद लागताच रुग्णालयात आईने प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही दुर्देवी घटना ४ मे रोजी अमळनेर तालुक्यातील निम येथे घडली आहे. सरलाबाई गुलाब गुर्जर (वय ५२ रा. निम, ता अमळनेर) असं मृत आईचं नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावापासून काही अंतरावर निम गाव आहे. या निम गावात सरलाबाई गुर्जर हे पती गुलाब सुपडू गुर्जर, मुलगा राकेश व मुलगी यांच्यासह वास्तव्यास होत्या. राकेश हा बांधकाम अभियंता आहे. गेल्या वर्षभरापासून सरलाबाई यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचाराला फारसे यश आले नाही. आपल्या जीवाचे कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी आपल्या एकुलत्या एक मुलाचे लग्न डोळ्यासमोर व्हावे, अशी इच्छा सरलाबाई गुर्जर यांनी पती गुलाब यांच्याकडे व्यक्त केली. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुलाब गुर्जर यांची धडपड सुरू झाली. गुलाब गुर्जर यांनी नातेवाईकांना सोबत घेत मुलगा राकेश याच्यासाठी मुलीचा शोध सुरू केला. चोपडा तालुक्यातील मंगरुळ गावातील शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित रोहिणी अशोक पाटील हिच्याशी राकेश याचा विवाह जुळला.

आई मुलाला म्हणाली, बेटा नाराज राहू नको , मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको, मात्र…

४ मे रोजी लग्नाची तारीख ठरली. त्यानुसार लग्नाची तयारी सुरू असताना, दोन दिवसांवर लग्न आल्यानंतर अचानक सरलाबाई गुर्जर यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना तातडीने अमळनेरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसांवर मुलाचा लग्न सोहळा असल्याने आईला काहीही होऊ नये म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तशी कल्पना नातेवाईकांनी डॉक्टरांना दिली होती. अखेर मुलाच्या हळदीचा दिवस आला. ३ मे रोजी मुलगा राकेश आणि वधू रोहिणी या दोघांनी हळद लागल्यापूर्वी रुग्णालयात जाऊन आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी सरलाबाई यांनी मुलगा राकेश यास आशीर्वाद देऊन बेटा नाराज राहू नको, मी लवकर उठून उभी राहील काळजी करू नको, असं त्या म्हणाल्या. तसंच सून रोहिणीच्या पाठीवरून हात फिरवून तिचा मुलाचा मुका घेतला आणि हळदीला उशीर होईल म्हणून दोघांना लवकर जाण्याचे सांगितले.

‘ज्या आईची आपण इच्छा पूर्ण केली, ती आई आता या जगात नाही’

आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर सायंकाळी घरी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. व्हिडिओ कॉलवर सरलाबाई यांनी हळदीचा कार्यक्रम पाहिला आणि मुलाला हळद लागल्याचे पाहून सरलाबाई यांना प्रचंड आनंद झाला. माझी इच्छा पूर्ण झाली असे डॉक्टरांना सांगत सरलाबाई यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र नंतर काही वेळातच सरलाबाई यांनी जगातून कायमचा निरोप घेतला. मात्र आईच्या निधनाची बातमी मुलाला कळवण्यात आली नाही. केवळ निवडक नातेवाईकांना कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी नातेवाईकांनी छातीवर दगड ठेवून विवाह सोहळा पार पाडला. ज्या आईची आपण इच्छा पूर्ण केली ती आई आता या जगात नाही, हे लग्नानंतर मुलगा राकेश याला कळल्यावर त्याने टाहो फोडला. आई तुझी इच्छा पूर्ण केली. मात्र मला आताच तू कायमस्वरूपी सोडून गेली, असं म्हणत आक्रोश करणाऱ्या राकेशला पाहून लग्नसोहळ्याला उपस्थित पाहुणे मंडळींना अश्रू अनावर झाले होते. सरलाबाई यांच्या निधनाने लग्नाचा आनंद काही क्षणात मावळला. अमळनेर येथून सरलाबाई यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. ज्या घरी काही तासांपूर्वी मंगलघटिका पार पडली, त्याच घरातून सरलाबाई यांची अंत्ययात्रा निघाली. या दुर्देवी घटनेने निम गावासह अमळनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार