शेततळ्यातून पिण्यासाठी पाणी भरण्यासाठी गेलेल्या मायलेकी दोघांच्या पाण्यात बुडून अंत, सुदैवाने एक मुलगी बचावली

Spread the love

बारामती : शेततळ्यात उतरून पिण्यासाठी पाणी काढताना पाय घसरून पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मायलेकींचा करुण अंत झाल्याची घटना बारामतीतील अंजनगाव येथे घडली आहे. दोन मुली व त्यांची आई अश्या तिघी जणी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या घटनेत तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिने आरडाओरडा केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

अश्विनी सुरेश लावंड (वय ३५), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी लावंड या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चरायला जातात. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीने पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी समृद्धी शेततळ्यावर गेली होती.

त्यावेळी शेततळ्यात टाकण्यात आलेल्या ताडपत्रीवरून तिचा पाय घसरला व ती बुडू लागली. मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला मात्र त्यांचाही पाय घसरला आणि दोघीही पाण्यात पडल्या. या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील दुर्दैवाने पाण्यात पडली.मात्र, श्रावणी शेततळ्यातील ताडपत्रीला धरून बाहेर पडली व तिने आरडाओरडा केला. तिच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला.

परंतू, तिथं नागरिक येण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी यांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृतदेह शेततळ्यात असल्याने व शेततळ्याच्या प्लॅस्टिकच्या अडथळ्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. स्थानिक उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार