जयपूर : आपल्या देशाच्या संविधानात धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. भारतामध्ये गेल्या कित्येक दशकांपासून विविध धर्म, जाती आणि पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.मात्र, अजूनही काही ठिकाणी जातीभेद पाळला जातो. जातींसंदर्भात आजही काही लोकांचे विचार इतके कट्टर आहेत की, त्यासाठी गुन्हेदेखील होतात. अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे उघडकीस आली आहे. आपला जावई आपल्या समाजातील (जात) नसल्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीनं आपल्या आधीच लग्न झालेल्या मुलीला छत्तीसगडमधील अंतागड शहरातील दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न करण्यास भाग पाडलं.
या प्रकरणातील पीडित मुलीनं आपल्या वडिलांविरुद्ध तक्रार केली आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पीडित मुलीनं वडिलांच्या निर्णयाविरुद्ध बंड करून आपल्या पहिल्या पतीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिनं तिच्या दुसऱ्या नवऱ्याला राखी बांधून त्यांचं पती-पत्नीचं नातंही संपवण्याचा प्रयत्न केला.
शिवाय, दुसरा पती आपला छळ करत असल्याचा आरोपही तिनं केला आहे. तिला आता तिच्या पहिल्या पतीकडे परत जायचं आहे, ज्याच्याशी तिनं स्वतःच्या इच्छेनं लग्न केलं होतं.तरूणा शर्मा असं या प्रकरणातील मुलीचं नाव असून तिनं राजस्थानमधील बालेसर येथील सुरेंद्र सांखला याच्याशी लग्न केलं होतं. सुरेंद्र आणि तरूणा प्राथमिक शाळेत असताना एकमेकांचे वर्गमित्र होते.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला तरूणाच्या वडिलांचा विरोध होता कारण सुरेंद्र त्यांच्या जातीतील नव्हता. लग्नानंतर 10 दिवसांनी तरूणाच्या कुटुंबीयांनी या जोडप्याचा शोध घेऊन त्यांना बालेसर पोलीस ठाण्यात आणलं. तिच्या कुटुंबानं या जोडप्याला जबरदस्तीनं वेगळं केलं.
“मला कुटुंबीयांनी गेल्या पाच महिन्यांपासून राजस्थान आणि गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांत डांबून ठेवलं होतं. माझा फोन हिसकावून घेतला होता आणि मला कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती,” असा आरोप तरूणा शर्मानं केला आहे. तिच्या कुटुंबियांनी अगोदर राजस्थानमधील एका मुलाशी तिचा साखरपुडा केला होता. मात्र, तो गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते लग्न मोडण्यात आलं.त्यानंतर 1 मे रोजी तिचं आणि छत्तीसगडमधील जितेंद्र जोशी यांचं लग्न झालं. काही दिवसांपूर्वीच तरूणाला रायपूर येथील एका रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. तेव्हा तिनं कोणाचा तरी फोन घेऊन तिच्या पहिल्या पतीशी संपर्क साधला. तिनं ट्विटरवर देखील तिची गोष्ट पोस्ट केली आहे.
अनेकांनी ही पोस्ट शेअर केली असून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदलाही यामध्ये टॅग करण्यात आलं आहे. दुसरा पती आपला छळ करत असल्याचा आरोप तरूणीनं केला आहे. त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण त्याला राखी बांधली असल्याचंही तिनं म्हटलं आहे. तर, तिचा दुसरा पती जितेंद्र जोशी याने हे आरोप खोडून काढले आहेत.
आपण तरूणीचा छळ करत नसून तिच आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे, असं जितेंद्र जोशीचं म्हणणं आहे. तिला असं करण्यापासून रोखण्यासाठी मी स्वत: तिच्याकडून राखी बांधूनघेतल्याचंही जोशी म्हणाला. झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना तिचा दुसरा नवरा म्हणाला, “मी तिला बहीण किंवा आंटी असं कधीच बोललो नाही. जर तिला माझ्याशी लग्न करायचे नसतं, तर ती नकार देऊ शकली असती.
मी तिच्याशी जबरदस्तीनं लग्न केलं नसतं. तिचे कुटुंबीय मला माझ्या घरी मागणी घालायला आले होते. मला फसवलं जात आहे.” अंतागड पोलीस स्टेशनचे प्रभारी रोशन कौशिक यांनी सांगितलं की, तरूणीला छत्तीसगडमधील कांकेर येथील सखी सेंटरकडे सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, तरूणीचा पहिला पती, सुरेंद्र सांखला बालपणापासून तिच्या प्रेमात आहे. तो म्हणाला की, तो मीडियासमोर अधिक माहिती सांगू शकत नाही. हे प्रकरण सध्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’कडे आहे. पोलीस त्याच्या पत्नीला सोडवण्यात मदत करतील.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..