रवंजा बुद्रुक मारहाण प्रकरणातील सहा संशयितांना अटक, चार दिवसांची पोलीस कोठडी.

Spread the love

एरंडोल | प्रतिनिधी :- रवंजा बुद्रुक (ता.एरंडोल) येथे मोटार सायकलचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत वीस वर्षीय युवकाच्या मृत्यू
प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली.अटक केलेल्या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता सर्वाना चार दिवस पोलीस कोठडीत
ठेवण्याचा आदेश न्यायाधीश भक्ती तळेकर यांनी दिला.दरम्यान रवंजा बुद्रुक येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी,की रवंजा बुद्रुक येथे काल (ता.७) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोटार सायकलचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती.या हाणामारीत नामदेव कोळी उर्फ रावण या वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता तर सुनील माळी व लक्ष्मण माळी यांच्यावर चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाले.याबाबत सुभाष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी काल लक्ष्मण गणपत माळी,राजू सुकदेव माळी,सुकलाल ईश्वर माळी, आकाश उर्फ भय्या सोमनाथ कोळी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज पोलिसांनी गोकुळ देवराम देशमुख व शिवदास श्रावण माळी यांचेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.सर्व सहाही संशयितांना आज न्यायालयासमोर उभे केले असता सर्वाना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश भक्ती तळेकर यांनी दिला.सरकारतर्फे सरकारी वकील रविता देवराज यांनी तर संशयीतांतर्फे ॲड.अजिंक्य काळे,ॲड.आकाश महाजन यांनी काम पाहिले. संशयितांमध्ये अटक करण्यात आलेले गोकुळ देशमुख हे माजी लोकनियुक्त सरपंच आहेत. दरम्यान हाणामारीत मृत्युमुखी पडलेल्या नामदेव कोळी याचेवर रवंजा बुद्रुक येथे तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रवंजा येथे दंगा नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार