उशिरा झालेली पेरणी, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव घेतलेले कर्ज कसे फेडणार,या विवंचनेत वृद्ध शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून संपविले जीवन.

Spread the love

अमळनेर l प्रतिनिधी

अमळनेर :- तालुक्यातील भरवस येथील वृद्ध शेतकऱ्याने शेतातील उशिरा झालेली पेरणी त्यातही कापूस पिकावर मर रोग व लाल्याचा प्रादुर्भाव दिसून आल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय ,तसे झाले तर कर्जे कसे फेडणार ह्या भीतीतून गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे दिनांक २६ रोजी पहाटे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी खरीप हंगामातील लहरीपणा , कोवळ्या कापूस पिकावर मर रोग व लाल्याचा प्रादुर्भाव मुळे हंगाम वाया जातो की काय अशी भीती मनाशी बाळगून बैठकीतील लोकांना ही आपल्या भावना व्यक्त करून ७५ वर्षीय आत्माराम सीताराम पाटील यांनी चिंतीत होत विवंचनेतून गाव विहिरीत उडी मारून आपले जीवनयात्रा संपवली.

तालुक्यातील भरवस येथे गावाचे पाणी सोडणारा पंकज पाटील हा दिनांक २६ रोजी सकाळी ७ वाजता पाणी सोडण्यासाठी गावविहिरीवर गेला असता पाण्याची पातळी पाहण्यासाठी त्यांनी विहिरीत ढुंकून पाहिले असता एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी गावकऱ्यांना आवाज दिल्याने ते जमा झाले व विहिरीत पडलेला इसम आत्माराम सीताराम पाटील (वय ७५) हे असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या घरच्यांना बोलवण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने खाटेला दोर बांधून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

व खाजगी वाहनात टाकून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविल्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले , याबाबत विजय पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सचिन निकम करीत आहेत. सदरहू शेतकरी हा कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची बैठकीत बसणाऱ्या वृद्ध मंडळींकडून सांगण्यात येत होते.

हे पण वाचा

टीम झुंजार