अमळनेर तालुक्यात कर्जाच्या नैराश्यातून ३९ वर्षीय तरूण शेतकऱ्याने गळफास लावून संपविले जीवन.

Spread the love

अमळनेर:- तालुक्यातील लोणचारम येथे ३९ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणचारम येथील शेतकरी संदीप प्रकाश पाटील (वय ३९) याने दिनांक ४ रोजी सकाळी ८ वाजेच्या आधी राहत्या घरी बेडरूममध्ये उभ्या भिंतीच्या कडीला दोरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

त्यावेळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यास उतरवत अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चुलतभाऊ विवेक पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.

सदर शेतकऱ्याच्या पश्चात वडील, पत्नी, व ६ वर्षाची मुलगी असून त्यांच्याकडे ५ बीघे कोरडवाहू शेती होती. तसेच त्यांच्यावर असलेल्या गृहकर्ज, उसनवारी व इतर कर्जामुळे ते गेल्या काही दिवसापासून नैराश्यात वावरत असल्याची माहिती मिळाली आहे. व त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार