चंदिगढ:- पती त्याच्या बहिणीकडे गेला असल्यानं पत्नी घरी एकटी होती. त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ घरी आले. आईनं तिचे हात धरले. भावानं पाय पकडले आणि वडिलांनी तिचा गळा आवळला. यानंतर तरुणीचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी गाव गाठलं. तिथे जंगलात अंत्यविधी केले. पतीला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. गावातील एका मित्रानं त्याला फोन करुन घटनाक्रम सांगितला. तुझ्या बायकोचा मृत्यू झाला. तिच्यावर अंत्यविधीही करण्यात आले, अशी माहिती त्यानं दिली.
त्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं पोलिसात धाव घेत सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
घटना १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता घडली. २२ वर्षांची अंजली गुरुग्रामच्या सेक्टर १०२ मधील रॉफ ऍल्यसमध्ये फ्लॅट नंबर २०१ मध्ये पती संदीपसोबत राहायची. अंजली बीएएससीचं शिक्षण घेत होती. गुरुवारी संदीप त्याच्या बहिणीच्या घरी तीजची मिठाई घेऊन गेला होता. त्यावेळी अंजलीच्या फ्लॅटवर भाऊ कुणाल, वडील कुलदीप आणि आई रिंकी पोहोचले. त्यांनी अंजलीवर हल्ला केला.
आईनं अंजलीचे हात पकडले, भावानं पाय घट्ट धरले. त्याचवेळी वडिलांनी तिचा गळा दाबला. हत्येनंतर तिघांनी मिळून अंजलीचा मृतदेह कारमध्ये ठेवला. त्यानंतर ते गुरुग्रामहून झज्जरमधील आपल्या गावी म्हणजेच सुरेतीला गेले.
अंजलीच्या कुटुबियांनी गावातील निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. गावातील कोणालाच याचा मागमूस लागला नाही. पण हळूहळू बातमी पसरली. गावातील एकानं अंजलीच्या पतीला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. संदीपला धक्काच बसला. त्यानं घटनेबद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीनं अंजलीच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं. चौकशीत तिघांनी हत्येची कबुली दिली.
ही घटना ऑनर किलिंगची असल्याचं एसीपी क्राईम वरुण दहिया यांनी दिली. अंजली आणि संदीप एकाच गावचे आहेत. अंजली जाट कुटुंबातील, तर संदीप ब्राह्मण कुटुंबातील आहे. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. १९ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी मंदिरात लग्न केलं. कुटुंबाचा विरोध असल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं ओळखून त्यांनी गाव सोडलं आणि गुरुग्राममध्ये राहायला गेले.अंजलीच्या निर्णयानं कुटुंब नाराज होतं. त्यामुळे तिच्या कुटुंबानं हत्येची योजना आखली. अंजलीच्या भावानंदेखील प्रेम विवाह केला. त्यानंतर त्यानं अंजली आणि संदीपशी संपर्क केला. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो दोघांसोबत त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागला. १७ ऑगस्टला संदीप त्याच्या बहिणीकडे गेला. याची माहिती कुणालनं आई वडिलांना दिली. काही वेळातच दोघे अंजलीच्या घरी पोहोचले. तिघांनी मिळून अंजलीला संपवलं.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






