मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया चषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा १० गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने ४८.२ षटकात २३० धावा केल्या. यानंतर पावसामुळे बराच वेळ खेळ थांबला होता.
टीम इंडियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार २३ षटकांत १४५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात भारताने २०.१ षटकांत १० गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा ७४ धावा करून नाबाद राहिला आणि शुभमन गिलने ६७ धावा केल्या.
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २३० धावा केल्या होत्या. या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला ४८.२ षटके लागली. त्याचवेळी पाकिस्तानने नेपाळ संघाचा २४ षटकांत पराभव केला होता. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख यांनी नेपाळ संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच निराशाजनक होते. पहिल्या काही षटकांमध्ये श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी तीन सोपे झेल सोडले. याचा फायदा घेत कुशल आणि आसिफ यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शार्दुल ठाकूरने भेदली. त्याने कुशलला यष्टिरक्षक इशानकरवी झेलबाद केले. कुशलला २५ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावा करता आल्या.
यानंतर रवींद्र जडेजाने भीम शार्के (७), कर्णधार रोहित पौडेल (५) आणि कुशल मल्ला (२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आसिफने गुलशन झासोबत ३१ धावांची भागीदारी केली. दरम्यान आसिफने आपले अर्धशतक पूर्ण केले. ८ चौकारांच्या मदतीने ९७ चेंडूंत ५८ धावा करून तो सिराजच्या हाती झेलबाद झाला. गुलशनलाही सिराजने यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. यानंतर दीपेंद्र सिंग ऐरी आणि सोमपाल कामी यांनी सातव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. हार्दिकने दीपेंद्रला पायचीत टिपले. त्याला २५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या.
सोमपालने दुसर्या टोकाकडून धावा सुरू ठेवत काही शानदार फटके मारले. सोमपाल ५६ चेंडूत १ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४८ धावा करून बाद झाला. संदीप लामिछाने नऊ धावा करून धावबाद झाला. त्याचवेळी सिराजने ललित राजबंशीला बाद करत नेपाळचा डाव २३० धावांवर संपवला. सिराज आणि जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय शमी, हार्दिक आणि शार्दुलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. सिराजने तीन विकेट घेतल्या, पण त्याने ९.२ षटकात ६१ धावा दिल्या. शार्दुलच्या चार षटकांत २६ धावा निघाल्या.
प्रत्युत्तरात टीम इंडिया बॅटींगला उतरली तेव्हा पावसाच्या व्यत्ययापूर्वी २.१ षटकांत एकूण १७ धावा केल्या. यानंतर काही तास सामना खंडित झाला. रात्री १०.१५ वाजता सामना पुन्हा सुरू झाला. पंचांनी सामना २३ षटकांचा केला. डकवर्थ लुईस पद्धतीने भारताला १४५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. टीम इंडियाने हे लक्ष्य २०.१ षटकांमध्ये पूर्ण केले. रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे आणि शुभमनने सातवे अर्धशतक झळकावले. हिटमॅनने ५९ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या. रोहितला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचवेळी शुभमन गिलने ६२ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली.
या विजयासह टीम इंडिया सुपर फोरमध्ये पोहोचली आणि नेपाळचा संघ आशिया चषकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.
गट-अ मधून पाकिस्तानने पहिले स्थान पटकावले आणि दुसरे स्थान मिळवून भारत सुपर फोरसाठी पात्र ठरला. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी अजूनही खुले आहेत. सुपर फोर फेरी ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर फोरमध्ये भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. याशिवाय भारतीय संघ सुपर फोरचा दुसरा सामना १२ सप्टेंबरला आणि तिसरा सामना १५ सप्टेंबरला खेळणार आहे. हे दोन्ही सामने कोलंबोमध्ये खेळवले जाणार आहेत.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






