एकाच गावातील १८ महिलांवर बलात्कार करणाऱ्या २१५ सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारावासाची शिक्षा, पीडितांना ३२ वर्षांनी मिळाला न्याय

Spread the love

वाचठी :-(तामिळनाडू) एकाच प्रकरणातील आरोपी असलेल्या २१५ सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता एकत्र तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तामिळनाडूमध्ये एकाच दिवशी १८ महिलांवरील बलात्काराचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी आता कोर्टाने निर्णय दिला आहे.

१९९२ मध्ये तामिळनाडूच्या वाचठी गावात एकाच दिवसात १८ महिलांवर बलात्कार झाला होता. मद्रास हायकोर्टाने आता या प्रकरणात सर्व २१५ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शिक्षा कायम ठेवली आहे. ही शिक्षा त्यांना सत्र न्यायालयाकडून मिळाली होती.

वाचठी गावात बलात्कार, प्राणघातक हल्ला, मालमत्तेचे नुकसान, गुरांची हत्या इत्यादी गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेल्या २१५ सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग १ चे काही अधिकारीही आहेत. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी सत्र न्यायालयाने या प्रकरणात १२६ वन विभागाचे कर्मचारी, ८४ पोलीस कर्मचारी आणि ४ आयएफएस अधिकार्‍यांसह महसूल विभागातील ५ जणांना दोषी ठरवले होते. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी वेलमुरुगन यांनी शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी याप्रकरणी निकाल दिला. सरकारी कर्मचार्‍यांनी बलात्कार केलेल्या १८ महिलांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला.

बलात्कारात दोषी आढळलेल्या सर्वांकडून नुकसानभरपाईच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम वसूल करावी, असा आदेशही न्यायाधीशांनी दिला. तसेच सर्व दोषींना १ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासेबतच मद्रास उच्च न्यायालयाने वाचठी गावातील लोकांवर असलेले तस्करीचे आरोपही फेटाळले आहेत.

यावेळी न्यायमूर्ती पी वेलमुरुगन यांनी सांगितले की, ‘सर्व गुन्हेगारी अपील फेटाळले आहेत. सरकारने प्रत्येक बलात्कार पीडितेला १० लाख रुपयांची भरपाई द्यावी. जर पीडित व्यक्ती जिवंत नसेल तर त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी. बलात्कारात दोषी
असलेल्यांकडून नुकसानभरपाईची ५० टक्के रक्कम वसूल करण्यात यावी. पीडितांना स्वयंरोजगार किंवा इतर कोणत्याही माध्यमातून योग्य नोकऱ्याही द्यायला हव्यात. तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वनअधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी,” असेही त्यांनी सांगितले.

काय आहे वाचठी प्रकरण?

२० जून १९९२ रोजी ही घटना घडली होती. तामिळनाडूच्या वन आणि महसूल विभागाला चंदन तोडून तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील वाचठी गावात छापा टाकण्यात आला.

या काळात तामिळनाडूच्या वन आणि महसूल विभागाच्या तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १८ महिलांवर बलात्कार केला होता. अनेक आदिवासींची घरे उद्ध्वस्त केली. त्यांची मालमत्ता नष्ट केली आणि गुरेढोरही मारली गेली होती. दरम्यान, ३२ वर्षे चाललेल्या या खटल्यात आता आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार