दिल्ली :- पीतमपुरा येथील वर्धमान मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवारी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तर त्याच्या दोन मैत्रिणीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका मुलीने पार्टी करणाऱ्या तरुणाची हत्या केली. ही दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. तरुणी ही तरुणाच्या शेजारी जाऊन बसली. यावेळी तरुणासोबत वर पार्टी करणाऱ्या इतर तरुणींसोबत तिचा वाद झाला. हा वाद टोकाला गेला.
तरुणीने तिच्या मित्रांना बोलवत तरूणांवर आणि त्याच्या मैत्रिणींवर चाकू व काठ्यांनी हल्ला केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न, पुरावे नष्ट करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रेस्टॉरंट मालकासह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट सुरू ठेवल्याचा आणि खून प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून मंगोलपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांवर कोर्टाने ताशेरे ओढले.
वाढदिवसाच्या दिवशीच खून
जतीन शर्मा (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात जतीनचे दोन मित्र प्रशांत आणि बाली हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जतीन हा आपल्या कुटुंबासह डी-ब्लॉक, बुध विहार, फेज-१ येथे राहतो. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता. रात्री पार्टी करण्याचा त्यांचा बेत होता. ‘यारों दा अड्डा’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जतीन प्रसिद्ध होता. हे रेस्टॉरंट पीतमपुरा येथील वर्धमान मॉलमध्ये आहे. रात्री १२.३० च्या सुमारास सर्वजण तेथे जमले आणि केक कापल्यानंतर खाणेपिणे झाले.
रात्री २.३० च्या सुमारास सर्वजण रेस्टॉरंटच्या बाहेर येऊन बसले. तेवढ्यात रेस्टॉरंटमध्ये काम करणारी आणि जतीनला आधीच ओळखणारी झोया नावाची मुलगी त्याच्या जवळ येऊन बसली. यावर जतीनसोबत पार्टीला आलेल्या दोन मुलींनी झोयासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. जेव्हा प्रकरण वाढले. झोयाला याचा राग आला. तिने रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तिच्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलावले. यानंतर या लोकांनी जतीन, प्रशांत आणि बाली यांच्यावर चाकू, लाठ्या, काठ्या, रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात जतीन, बाली आणि प्रशांत जखमी झाले. जखमींना भगवान महावीर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे जतीनला मृत घोषित करण्यात आले. यानंतर इतर जखमींना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. दुसरीकडे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी रेस्टॉरंटमध्ये आणि बाहेर पसरलेल्या रक्तात पाणी टाकून धुवून काढले.
सीसीटीव्हीद्वारे ओळख
पोलीस उपायुक्त जिमी चिराम यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी साडेसहा वाजता भगवान महावीर रुग्णालयातून जतीनच्या मृत्यूची माहिती मिळाली. क्राईम टीम व्यतिरिक्त एफएसएल आणि इतर पथकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. ज्या भागात ही घटना घडली तो भाग पाण्याने धुतला गेला, मात्र पथकाला रक्ताचे कापड त्या ठिकाणी आढळले. तसेच घटनास्थळी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावरून अनेक आरोपींची ओळख पटली असून, रेस्टॉरंट मालकासह एकूण सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






