जालना : रामनगर साखर कारखान्यासमोरील एका हॉटेल मालकाने कामगार राहिलेल्या महिलेचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवार, ११ मे रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी हॉटेल मालकास मौजपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सुभिद्रा वैद्य (वय ४०) या मागील सात-आठ वर्षांपासून परिसरातील लंका हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करत होत्या. चार महिन्यांपूर्वी सुभिद्राबाई यांना मुलगा सचिन वैद्य (वय २०) याने हॉटेलवर कामासाठी जाऊ नको अशी ताकीद दिल्यानंतर महिलेने हॉटेलमध्ये काम करणे बंद केले होते.
दरम्यान, हॉटेलमालक गणेश कातकडे (वय ४५) हा कामावर येण्यासाठी महिलेवर दबाव टाकत होता. त्या कामावर जात नव्हत्या. याचा राग मनात धरून आरोपी गणेश कातकडे याने शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास सुभिद्रा वैद्य यांचे घर गाठले. घराची कडी वाजवून दार उघडण्यास भाग पाडले. त्या घराबाहेर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गणेश कातकडे याने सुभिद्रा वैद्य यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घरात झोपलेला महिलेचा मुलगा सचिन वैद्य हा भांडणाच्या आवाजाने झोपेतून उठून बाहेर आला. गणेश कातकडे याने सचिन वैद्य याच्यावर देखील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच सचिनच्या मित्राच्या हातावरदेखील वार केले. याप्रकरणी सुभिद्रा वैद्य यांची बहीण शितल ठोके (३१) यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शनिवारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमी सचिन वैद्य यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपीस अटक
रामनगर कारखाना परिसरातील लंका हॉटेलचा मालक असलेल्या गणेश कातकडे याने रात्री दारूच्या नशेत हॉटेल काम करणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेवर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, रविवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.- मिथुन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक, मौजपुरी पोलिस ठाणे, जालना.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.