फर्रुखाबाद :- नात्यानं चुलत भाऊ बहीण. नंतर प्रेमसंबंध जुळलं. घरच्यांचा विरोध तरीही लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसानंतर नवविवाहित जोडप्याचा मृतदेह घरात आढळला. ही धक्कादायक घटना गाजियाबादमधील कविनगर पोलीस स्टेशन परिसरातील महिंद्र एन्क्लेनव्हमध्ये फर्रुखाबादमध्ये घडली आहे.आत्महत्या केल्यानंतर मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट सापडली होती. ज्यामध्ये दोघांनी मुलीच्या कुटुंबाकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.पियुष सिंग आणि निशा हे मुळचे फर्रुखाबाद जिल्ह्यातील कैमगंज पोलीस स्टेशनमधील अल्लाहपूर गावातील रहिवासी होते. हे जोडपं महिंद्रा एन्क्लेव्हच्या एफ – ब्लॉकमध्ये सोहनवीर सिंग यांच्या घरात भाड्यानं राहत होते.
पियुष मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. मात्र, मंगळवारी घरमालकाला खोलीत गळफास घेत जोडप्यानं आत्महत्या केली असल्याचं आढळलं. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कविनगरचे एसीपी स्वतंत्र कुमार सिंह सांगतात, ‘पियुष सिंग आणि निशा हे नात्याने चुलत बहीण भाऊ होते. दोघांनी १६ फेब्रुवारीला घरातून पळ काढला होता. या जोडप्यानं १७ फेब्रुवारीला गाझियाबाद कोर्टात लग्न केले होते. निशाच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध होता. निशाचे कुटुंब पियुषच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
याबाबत दोघांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाईल’.सुसाईड नोटमध्ये पीयुषने लिहिले की, ‘आम्ही दोघांनी स्वेच्छेने लग्न केले आहे. निशाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. निशाचे कुटुंब आम्हाला धमकावत होते. आम्हाला तीन मुलं आहेत. एका मुलगा तुमची हत्या करून जेलमध्ये जाईल. तरीही आमचा सांभाळ करण्यासाठी दोन मुले आहेत. अशा प्रकारचे आम्हाला धमक्या देण्यात येत होत्या. याच धमक्यांना कंटाळून आम्ही हे टोकाचं पाऊल उचलत आहोत.’सुसाईड नोटमध्ये निशाने लिहिले की, ‘मी स्वत:च्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. मी माझ्या जोडीदारासोबत राहू शकत नाही तर, निदान या जीवनाचा अंत त्यांच्यासोबत करू शकते. मृत्यूनंतर आमच्या दोघांचे अंत्यसंस्कार एकत्र करावेत ही विनंती’.






