गडचिरोली :- वडिलांचे छत्र आधीच हरपलेले. एकट्या आईला खूप कामे करावी लागतात म्हणून मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि स्वागत समारंभही आटोपला. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक प्रकृती बिघडली आणि हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथे शनिवारी (ता.३) घडली. नारायण कंवलसिंह बोगा (वय २६) असे मृत नवविवाहित युवकाचे नाव आहे.
नारायणच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तेव्हापासून आई आणि नारायण दोघेच राहायचे.३० एप्रिलला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरुराम कुमेटी यांच्या दीपिका नावाच्या मुलीशी त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभही पार पडला. लग्नाच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाइकांना सांगितले होते. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला.
त्याला बरे वाटू लागले. मात्र, शनिवारी पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागले. यामुळे तो मित्र आणि नववधूला घेऊन स्वत:च मोटारसायकल चालवत वासळी येथील दवाखान्यात जाण्यासाठी निघाला. परंतु, बोरी गावाजवळ त्याची प्रकृती अधिकच बिघडली. मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके ठेवले आणि तेथेच प्राण सोडला.