
जम्मू – काश्मीर : – गेल्या महिन्याभरात हिंदू रहिवासी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर आठ हल्ले झाले. हे हल्ले हिंदूंना लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी घडवून आणले आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळं नागरिकांमध्ये असुरक्षितता आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी बिगर काश्मिरी कर्मचाऱ्यांवर निशाणा साधण्याचा नवा कट पूर्णत्वास नेत आहेत. मंगळवारी हिंदू शिक्षिका रजनीबाला यांच्या हत्येनंतर गुरुवारी दोन ठिकाणी बिगर काश्मिरींवर हल्ले झाले. पहिला हल्ला सकाळी कुलगाममध्ये झाला. तेथे राजस्थानचे रहिवासी २५ वर्षीय बँक व्यवस्थापक विजयकुमार यांची हत्या करण्यात आली. विजयकुमार तीन दिवसांपूर्वी अन्य शाखेतून बदली होऊन स्थानिक ग्रामीण बँकेच्या(ईडीबी) कुलगाम शाखेत आले होते. गुरुवारी सकाळी ते डेस्कवर होते. अचानक मुखवटा घातलेला एक जण आत आला. त्याने खूप जवळून गोळी झाडली आणि पळून गेला. विजय यांना रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. दुसरा हल्ला बडगाममध्ये झाला. तेथे दोन वीटभट्ट्यांच्या मजुरांवर निशाणा साधला. यात बिहारचा रहिवासी दिलसुखचा मृत्यू झाला. पंजाबचा रहिवासी गोरिया जखमी आहे. काश्मीरच्या स्थितीवर अनेक दशकांपासून लक्ष ठेवून असणारे तज्ज्ञ सांगतात की, अतिरेकी बिगर काश्मिरींमध्ये दहशत पसरवून त्यांना काश्मीरमध्ये रोजगारापासून वंचित ठेवू इच्छितात. त्यामुळे सुरक्षा संस्थांचे आव्हान कैक पट वाढले आहे

पलायन : हिंदू सामानासह जम्मूत जाताहेत
सरकारी आश्वासने आणि जिल्हा मुख्यालयांवरील सुरक्षित पोस्टिंग असतानाही दुसऱ्या दिवशी पंडित कर्मचाऱ्यांनी श्रीनगरमधून जम्मूत पलायन केले. आता अन्य हिंदू कर्मचारीही जम्मूला निघत आहेत. आतापर्यंत शेकडो कुटुंबे गेली असून शेकडो तयारीत आहेत. अनेक लोक रात्रीतून बाहेर पडत आहेत. गांदरबल, श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरच्या निर्वासितांच्या छावण्यांत राहणाऱ्या हिंदूंनी केलेल्या आरोपानुसार, पोलिस त्यांना गेटबाहेर जाऊ देत नसल्याचे म्हटले आहे. श्रीनगरच्या ग्रामीण भागातून गाडी पकडण्यासाठी शहरात आलेला एक कर्मचारी म्हणाला की, सरकारने आम्हाला जिल्हा मुख्यालयात नियुक्ती दिली. मात्र, हे पुरेसे नाही. आम्हाला दूध, किराणासाठी बाजारातही जावे लागते. मुले शाळेत कशी जातील? पोलिस प्रत्येक ठिकाणी सुरक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे जम्मूला जाण्याचा पर्याय आहे. बाकीच्या गोष्टींचा नंतर विचार करू. एक अन्य कर्मचारी म्हणाला, जिल्हा मुख्यालयावरही सर्व बिगर मुस्लिमांना पोस्टिंग धोकादायक आहे.
शहा-डोभाल यांची बैठक
२२ दिवसांमध्ये ८ वे टार्गेट किलिंग, त्यात ४ हिंदू होते या वर्षी काश्मीरमध्ये १९ नागरिकांचा मृत्यू झाला. ८ खून २२ दिवसांत झाले. या ८ लोकांपैकी ४ हिंदू होते. सुटीवरील सुरक्षा दलाचे ३ कर्मचारी होते. एक टीव्ही कलाकार होती. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व एनएसए अजित डोभाल यांची गुरुवारी बैठक झाली. शुक्रवारी सविस्तर आढावा बैठक होणार आहे. यात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, अजित डोभाल, जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबागसिंग, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीपसिंग आणि एसएसबी प्रमुख यांचा समावेश होता.
गाडीच्या आत स्फोट, एक जवान शहीद
शोपियांत वाहनाच्या स्फोटात ३ जवान जखमी झाले होते. त्यापैकी एक जवान पवन रावत शहीद झाले. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि मोहीम सुरू केली. तीन सैनिक गाडीतून पुढे जात होते.
१९९०पासूनचा जुना डाव
हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडायची, काश्मीर कायम अशांत ठेवायचे आणि काश्मिरातून पुन्हा एकदा भयभीत हिंदू कुटुंबांचे जम्मू भागात किंवा भारताच्या उर्वरित भागात स्थलांतर घडवून आणायाचे, असा हा जुनाच आणि १९९० पासून चाललेला डाव आहे. तो आता यशस्वी होऊ न देण्याचे आव्हान जम्मू-काश्मीरचे प्रशासन आणि केंद्र सरकारपुढे उभे आहे.
नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
काश्मीरातील परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. काश्मिरातील जवळपास दीडशे कुटुंबानी जम्मू किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केल्याचे वृत्त समोर येत आहे. तर, काश्मिरी पंडितांच्या वसाहतींना चारी बाजूंनी कडेकोड बंदोबस्त देण्यात आला आहे.





